• Sat. Mar 7th, 2026
    ‘लाव रे तो व्हिडीओ’; विजय वडेट्टीवार यांचा व्हिडीओ दाखवत भुजबळांचा निशाणा

    छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंसोबतचा व्हिडीओ दाखवत निशाणा साधला. आपण नागपूरला वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्याला का गेलो नव्हतो? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बीड : मंत्री छगन भुजबळ यांनी आज बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा व्हिडीओ दाखवत निशाणा साधला. विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ गेले नव्हते. त्यावर भुजबळांनी आजच्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांचा व्हिडीओ स्क्रिनवर दाखवला. या व्हिडीओत विजय वडेट्टीवार मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूला बसून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं, असं बोलताना दिसले. हा व्हिडीओ दाखवत छगन भुजबळ यांनी वडेट्टीवारांवर टीका केली.

    “विजय वडेट्टीवर एकच मुद्दा घेऊन उभे राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण जरांगेंच्या जवळ जावून एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून, अंबडच्या मीटिंगमध्ये जावून तुम्ही सांगणार की, तुमच्याबरोबर आहे. नंतर आमच्याकडे पाठ फिरवणार. हे कसंकाय शक्य आहे? म्हणून मी संपादकांना सांगितलं की, बघा हे व्हिडीओ”, असं छगन भुजबळ म्हणाले.

    “तुम्ही तासा-तासाला बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. मी इथे पक्षासाठी काम करत नाहीत. आम्ही इथे ओबीसींसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाहीत. पक्षाच्या वेळीला पक्षाचं काम करु. पण ओबीसींच्या वेळेला फक्त ओबीसींसाठीच लढणार”, असा निर्धार भुजबळांनी बोलून दाखवला.

    “तुम्ही राजकारण करु नका. तुम्हीच म्हणाला होता की, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि देवेंद्र फडणवीस यांना काढा म्हणत आहात. हे तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं त्या विखे पाटील यांचं नाव घ्याना. ते नाही. त्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मला माहिती आहे. तुमच्या सर्व मतदारसंघात ओबीसी आणि मागासवर्ग आहेत. तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही”, असं भुजबळांनी ठणकावून सांगितलं.

    छगन भुजबळ आणखी काय-काय म्हणाले?

    “मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मराठा समाज आणि आमच्यात अंतर हे अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला आम्ही वारंवार वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. मुंबईत 10-15 हजार माणसं आणली, सरकारने थोडी नरमाईने घेतली म्हणून तुमची दादागिरी झाली. पोलिसांना सांगितलं असतं ह्यांना कामाला लावा. एक रात्र थांबायला पाहिजे होतं. पोलिसांनी मुंबईचा सर्व रस्ता साफ केला होता. हे लोकं मराठा समाजाचे नव्हते. तर ते दारुवाले, वाळूचोर होते. या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे लोक होते.”

    “आम्ही आतापर्यंत गप्प बसलो. पण किती गप्प बसायचं? मी 374 जातींसाठी बोललो. आम्ही सांगतो तुमचं आरक्षण वेगळं घ्या, आमच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका. आम्हाला वेडं समजलं का? आम्हाला मुर्ख समजू नका. एक आवाड बंजारा समाजाने दिल्यानंतर आदिवासी समाज उठला. पण आम्ही मात्र गप्प बसायचं आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसवून घ्यायचं हा कुठला न्याय आहे? ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, ओबीसी तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, अरे महाराष्ट्र काय तुमच्या सात-बाऱ्यावर लिहून दिला का? हे मागे बसलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लढले.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा