Raigad Wife Killed Husband: पती-पत्नीत दुरावा वाढला. त्यानंतर तिचं इंस्टाग्रामवरुन ओळख झालेल्या एका तरुणावर प्रेम जडलं. त्यांच्या नात्यात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचा प्लॅन करण्यात आला.
मृत तरुणाचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय 23, रा. गौळवाडी, पाबळ, पेण) असे असून त्याचा खून पत्नी दिपाली अशोक निरगुडे (19), प्रियकर उमेश सदु महाकाळ (21) आणि मैत्रीण सुप्रिया चौधरी (19) यांनी संगनमत करून केला आहे. या तिघांना नागोठणे पोलिसांनी केवळ 24 तासांत गाठून अटक केली आहे.
दिपालीचे पती कृष्णाशी संबंध ताणलेले होते. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख सोशल मीडियावर उमेश महाकाळ या तरुणाशी झाली. हळूहळू या दोघांचे ‘इंस्टाग्राम प्रेम’ वाढत गेले आणि त्यांनी कृष्णाला संपवण्याचा कट रचला.
Raigad News: बहिणीला बॉयफ्रेंडसोबत कारमध्ये पाहिलं, भावाला राग अनावर, हॉकी स्टिक काढली अन्… अलिबाग बीचवर खळबळ
त्यासाठी “वारगुडे” या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले. या खात्यामार्फत कृष्णाशी संवाद साधून त्याला “मैत्रिणी”च्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आले. 10 ऑक्टोबर रोजी आरोपींनी कृष्णाला नागोठणे एस.टी. स्टँडवर बोलावले. त्यानंतर त्याचे अपहरण करून वासगावच्या जंगलात नेण्यात आले. तिथे त्याला ओढणीने गळा आवळून ठार मारण्यात आले.
खून केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले, तसेच त्याचा मोबाईल फोडून पाली रोडलगत फेकून दिला.
सुरुवातीला हे प्रकरण बेपत्ता म्हणून नोंदवण्यात आले होते. मात्र, नागोठणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची दिशा बदलली. पोलिसांनी तांत्रिक तपास वापरून आरोपींपर्यंत पोहोच घेतली आणि अखेर तिघेही जाळ्यात अडकले.
पोलिस चौकशीत आरोपी दिपालीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पतीकडून सतत त्रास होत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. तिच्या प्रियकर उमेशच्या मदतीने तिने पतीला संपवण्याची योजना आखली होती. या कटात तिची मैत्रीण सुप्रिया देखील सहभागी झाली होती.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा तपास केवळ वेगाने नव्हे तर अत्यंत व्यावसायिक पद्धतीने केल्याने नागोठणे पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रायगड पोलिसांचा नागरिकांना इशारा
सोशल मीडियावर अपरिचित व्यक्तींशी संवाद साधताना सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद माहिती किंवा हालचाल दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन रायगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

