• Tue. Jun 16th, 2026

    पत्नीला संपवलं, नंतर चाकूसह पोलीस ठाण्यात पोहोचला पती; स्थिती पाहून पोलिसांनाही धक्का, सोलापुरात खळबळ

    पत्नीला संपवलं, नंतर चाकूसह पोलीस ठाण्यात पोहोचला पती; स्थिती पाहून पोलिसांनाही धक्का, सोलापुरात खळबळ

    Solapur Crime: सोलापूरमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच तिला चाकूने वार करून ठार केले. आरोपी सुहास सिद्धगणेश याने पत्नी यशोदा हिला पोटात व गळ्यावर वार करून तिचा जीव घेतला आणि त्यानंतर रक्ताने माखलेला चाकू घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाला.

    पत्नीला संपवलं, नंतर चाकूसह पोलीस ठाण्यात पोहोचला पती(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: सोलापूर शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चाकूने भोसकून ठार केलं आहे. सुहास तुकाराम सिद्धगणेश (रा. तळेहिप्परगा सोलापूर) असं संशयित आरोपीचं नाव असून यशोदा सुहास सिद्धगणेश असं मृत महिलेचं नाव आहे. ही घटना सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली आहे.

    अन्नपूर्णा बाळशंकर(वय 50 वर्ष) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुहास सिद्धगणेश हा अनेक महिन्यांपासून पत्नी यशोदा याच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे दोघा पती-पत्नीत तक्रार होत होती. मंगळवारी सकाळी या तक्रारीचे भांडणात रूपांतर झाले आणि दोघांच्या संसाराचा भयंकर शेवट झाला. सुहासने पत्नीला ठार करून थेट पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना हकीकत सांगितली. रक्ताने माखलेले कपडे आणि हातात चाकू पाहून पोलिसांना धक्काच बसला. यशोदाच्या आईने आणि बहिणीने तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत यशोदा यांची बहीण अन्नपूर्णा बाळशंकर यांनी सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यशोदा सिद्धगणेश ही अनेक दिवसांपासून एका मुलीला सोबत घेऊन सोलापूर शहरात पतीपासून विभक्त राहत होती. मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास यशोदा सिद्धगणेश हिच्या घरातून जोरात ओरडण्याचा आवाज येत होता. त्यावेळी अन्नपूर्णा बाळशंकर यांनी यशोदाच्या घरात आत डोकावून पाहिलं असता यशोदा लोखंडी बेडजवळ जमिनीवर खाली पडलेली होती व सुहास सिद्धगणेश हा त्याच्या हातातील चाकूने यशोदा हिच्या पोटात व गळ्यावर वार करुन चाकू खुपसत होता.

    मध्ये कुणी आला तर खल्लास करेन; सुहासने धमकी दिली-

    अन्नपूर्णा बाळशंकर यांनी आरडाओरडा करुन यशोदा हिच्या जवळ जात जाण्याचा प्रयत्न केला. सुहास याने हातात चाकू घेऊन म्हणाला की, “आमच्या मध्ये कोणी आला तर, मी सर्वांना खल्लास करुन टाकीन” अशी धमकी देत यशोदाला खुपसतच राहिला. काही वेळाने हातामध्ये चाकू घेऊन सुहास सिद्धगणेश हा घरातून निघून गेला. हातामध्ये असलेला चाकू रक्ताने माखलेला होता. अन्नपूर्णा यांनी आरडाओरडा करुन आजूबाजूच्या लोकांना गोळा केले. यशोदा ही रक्ताचे थोरोळ्यात निपचित पडली होती. आजूबाजूच्या लोकांनी यशोदा सिद्धगणेश हिला रिक्षामध्ये सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी यशोदा हिला तपासून ती मयत झाली असल्याचे सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा