• Sat. Mar 7th, 2026
    एशियाटिकचा वाद ‘धर्मादाय’च्या दरबारी; 13 जतन केलेल्या वस्तू गायब झाल्याची आयुक्तांकडे तक्रार

    The Asiatic Society of Mumbai: द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या संस्थेतील 13 दुर्मिळ जतन केलेल्या वस्तू गायब झाल्याची आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

    asiatic society mymbai(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    अनुजा चवाथे, मुंबई : ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ या संस्थेच्या निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नसली, तरी संस्थेबाबत दररोज नवे वाद समोर येत आहेत. या संस्थेतील १३ दुर्मीळ आणि जतन केलेल्या वस्तू गायब असल्याचे काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारातून समोर आल्यानंतर या संदर्भात आता धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

    या १३ वस्तूंसोबतच संग्रहालयातील सातारच्या गादीचे मराठा शिक्कामोर्तब गहाळ झाल्याची, संग्रहालयातील दुर्मीळ १२ हजारांहून अधिक नाण्यांची दर तीन वर्षांनी होणारी मोजणी रखडल्याची आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला दिलेल्या दुर्मीळ वस्तूंच्या सद्यस्थितीबद्दल असलेल्या अनभिज्ञतेची कुजबूज सुरू झाली आहे. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईकडे असलेल्या दुर्मीळ आणि संग्राह्य वस्तूंपैकी १३ वस्तू गायब असल्याचे सन २०१७च्या एका अहवालात समोर आले होते. माहिती अधिकाराद्वारे यासंदर्भात विचारणा केल्यानंतर ही माहिती संस्थेच्या इतर सदस्यांपर्यंत पोहोचली. या दुर्मीळ वस्तूंबाबत दुर्लक्ष होत असून कारभारात पारदर्शकता नसल्याची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
    Maharashtra Timesएकनाथ शिंदे यांच्या योजना थंड बस्त्यात? आनंदाचा शिधानंतर ‘माझी शाळा’वर लाल शेरा
    काळा घोडा येथील तत्कालीन ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आकाराला येत असताना ‘एशियाटिक’तर्फे संग्रहालयाला काही दुर्मीळ वस्तू देण्यात आल्या होत्या, मात्र या वस्तूंची सद्यस्थिती संस्थेच्या सदस्यांना माहीत नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. यासोबतच ‘एशियाटिक’ला १९व्या शतकात सातारच्या गादीने सात शिक्कामोर्तब (मराठा सील्स) दिले होते. या शिक्कामोर्तबाचे काय झाले, अशी विचारणा इतिहास अभ्यासक उदय कुलकर्णी यांनी केली होती. तेव्हा सन १९६३नंतरची कोणतीही माहिती समोर आली नव्हती, तसेच हे शिक्कामोर्तब कुठे आहेत कळले नव्हते.

    यासंदर्भात कुलकर्णी यांनी राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनीही ‘एशियाटिक’कडे विचारणा केली होती. सोशल मीडियावरही हे प्रकरण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे दुर्मीळ वस्तू कुठे आहेत, हेही पदाधिकाऱ्यांना का माहीत नव्हते, अशी विचारणा सदस्यांकडून करण्यात येत होती. यासोबतच संस्थेकडे असलेल्या १२ हजारांहून अधिक नाण्यांची मोजणी सन २०२२नंतर झालेली नाही. वार्षिक अहवालातही हे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संस्थेकडील दुर्मीळ वस्तूंबद्दल इतकी उदासीनता आणि निष्काळजी का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesTrain Cancelled: रेल्वेप्रवाशांसाठी मोठी बातमी! दोन दिवस मुंबई, पुण्यातून सुटणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेस रद्द, यादी पाहा
    ‘या संस्थेमध्ये कायम अभ्यासक, संशोधक पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र आता ही निवडणूक राजकीयदृष्ट्या आकाराला येत असल्याचे दिसत आहे. यासोबतच संस्थेचा कारभार ज्या महिला चालवत होत्या, त्यांचीही विविध विशेषणे लावून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा आरोप संस्थेच्या अध्यक्ष विस्पी बालापोरिया बालापोरिया यांनी केला.

    ‘मराठा शिक्कामोर्तबांबद्दल ६०च्या दशकानंतर माहिती उपलब्ध नव्हती, मात्र ती आता उपलब्ध झाली आहे. ते एका संग्रहालयाकडे आहे. हे गहाळ झाले नाही. नाण्यांच्या मोजणीच्या बाबतीत मात्र यासंदर्भात मोजणी करणारे नाणेतज्ज्ञ महेश कालरा यांच्या निधनानंतर तितकी विश्वासार्ह व्यक्ती आढळली नाही. यामुळे ही मोजणी सन २०२२नंतर रखडली. अशी व्यक्ती शोधण्यासाठी अधिक प्रयत्न गरजेचे होते,’ असेही त्या म्हणाल्या.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा