• Sun. Jun 7th, 2026

    नळाला पाणी आलं, मोटार लावायला गेल्या अन् जोराचा आवाज… घरातच विवाहितेचा हादरवणारा अंत

    नळाला पाणी आलं, मोटार लावायला गेल्या अन् जोराचा आवाज… घरातच विवाहितेचा हादरवणारा अंत

    Chhatrapati Sambhajinagar Woman Died: छत्रपती संभाजीनगर येथे एका महिलेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नळाला पाणी आल्यानंतर विद्युत मोटर लावत असताना विजेचा शॉक लागून 40 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना संभाजीनगरातील उस्मानपुरा भागातील त्रिशरण नगर येथे उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चित्रा संदीप गायकवाड (वय 40 राहणार त्रिशरण नगर उस्मानपुरा) असं मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रा गायकवाड या कुटुंबासह उस्मानपुरा भागात राहतात. त्यांचे पती संदीप गायकवाड हे रेल्वे विभागात नोकरी करतात. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे.
    Maharashtra Timesनिवृत्त बँक कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलासोबत आयुष्य संपवलं, अखेरच्या पत्रातून धक्कादायक उलगडा
    दरम्यान, शहरात पाण्याची समस्या ही नेहमीचीच आहे. जायकवाडी धरणात मुबलक पाणीसाठा असताना देखील आठ दिवसाआड पाणी येतं. यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांची नेहमीच धडपड होत असते. दरम्यान, शनिवारी उस्मानपुरा भागातला पाण्याचा पहिला टप्पा होता. नळाला पाणी आल्यामुळे चित्रा गायकवाड यांनी पाणी वाया जाऊ नये, पाणी मिळावं यासाठी काही गडबडीने विद्युत मोटर बाहेर काढत चालू केली. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. मोठा आवाज झाल्याने ही बाब नातेवाईकांच्या लक्षात आली.

    त्यांनी जाऊन पाहिलं असता, चित्रा यांना विजेचा शॉक लागल्याचं दिसलं. नातेवाईकांनी तात्काळ चित्रा यांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी चित्रा यांना तपासून मृत घोषित केलं. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. चित्रा गायकवाड यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच टाहो फोडला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा