• Fri. Jul 3rd, 2026

    शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेत विमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 9, 2025
    शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेत विमा रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री मेघना बोर्डीकर – महासंवाद

    परभणी, दि. 09 (जिमाका) : शेतकऱ्यांना पिकविम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पिकविमा कंपनीने समन्वयाने कामे करावे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पिक कापणीचे प्रयोग होतील याचे नियोजन करावे. सर्व महसूल, कृषी, ग्रामविकास आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी समन्वयाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काम करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप व निधी मागणी आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, संगीता चव्हाण, उदयसिंह भोसले, सर्व तहसिलदार आदींसह महसूल, कृषि, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपनीचे अधिकारी /प्रतिनिधी उपस्थित होते.

    श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीची मिळालेली रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. मागील वर्षी शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला. यावेळेस एकही तक्रार शेतकऱ्यांची येणार नाही याची काळजी विमा कंपनीने घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच नदीकाठच्या गावातील शेतातील विहिरीमध्ये साचलेल्या गाळाच्या बाबतही पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.

    प्रारंभी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसानीच्या अनुदान वाटपाबाबतची माहिती आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पंचनामे आणि निधी मागणीच्या बाबत करण्यात आलेली कार्यवाही याबाबतची सविस्तर माहिती दिली.

    श्री. चव्हाण म्हणाले की, ऑगस्ट महिन्यात नुकसानीपोटी मिळालेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच माहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांच्या ई-केवासीसाठी सेतु सुविधा केंद्र सकाळी आणि सायंकाळी जास्त वेळ चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

    जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

     जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

    परभणी, दि. 09 (जिमाका) : जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम असून ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करणारी एक महत्त्व पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

    जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचे लोकार्पण आज पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परषिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, महानगर पालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, प्रकल्प संचालक स्मिता पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता डी. एस. उडाणशिवे उपस्थित होते.

    पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या दूर करुन चांगल्या सोई-सुविधा दिल्या जातात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत लोकांना देण्याचे काम केले जाते. परभणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी उत्कृष्ट काम केले आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षणाचे काम उल्लेखणीय केले आहे. परभणी जिल्हा परिषदेने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये चांगले काम केले असून 150 दिवसाच्या कार्यक्रमातूनही केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान सुरु असून परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या मोहिमेमध्ये सहभागी करुन घेऊन राज्यस्तरावरील पुरस्कार मिळण्यासाठी सर्वांनी चांगले काम करण्याचे आवाहनही पालकमंत्री  यांनी  केले.

    जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने आकार कुशल अंगणवाडी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दिल्ली येथे आयोजित उडाण-2025 या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अंगणवाडी सेविका वत्सला काळुराम भारशंकर, आघाव वाडी ता. जिंतूर, आशा पुरभाजी झुंझारे, आडगाव ता. जितूंर तसेच रॉकेट लर्निंग जिल्हा समन्वयक सोमनाथ चिंचकर यांचा सत्कार पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

    जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत जनतेपर्यंत पोहोचविल्या जावून ग्रामीण जनतेचा विकास करण्याचे मोलाचे कार्य जिल्हा परिषदेमार्फत केले जाते. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी म्हणाले की, जिल्हा परिषदेचे सभागृह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आले असून हे सभागृह निश्चितच उपयोगी ठरणार आहे.

    प्रारंभी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी प्रास्ताविकेतून जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. यावेळी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    असे आहे जिल्हा परिषदेचे सभागृह

    जिल्हा परिषद सदस्यांची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभा तसेच वेगवेगळ्या विषय समिती सभा आयोजित करण्याकरिता जिल्हा परिषदेमध्ये नूतन सभागृह तयार करण्यात आले आहे. या सभागृहाचे एकूण आसन क्षमता जवळपास 150 इतकी असून यात एक प्रोजेक्टर, 7 इंटरनेट कनेक्टेड टेलिव्हिजन सेट, 80 मायक्रोफोन पॉइंट व 22 टन एअर कंडिशनिंग कार्यान्वित करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed