• Sun. Jun 7th, 2026
    Wardha News : व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले, तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज; अखेर…

    Wardha News : सुनील यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती वडील भीमराव यांना त्रास होईल म्हणून दिली नव्हती. त्यांना रात्रभर मोर्शी येथील मुलीकडे नेण्यात आलं होतं. मात्र काल त्यांना गावात आणल्यावर त्यांना जशी आपल्या मुलाची वार्ता कळली, ते ढसाढसा रडत होते. ‘माझ्या घरी एवढे लोकं कशासाठी जमले?’ असा प्रश्न प्रत्येकाला विचारत होते.

    वर्धा : मृत्यू कधी केव्हा येईल हे कुणालाही सांगता येत नाही. मात्र एखाद्याचा मृत्यू झुंज देता देता होतो, त्यावेळी संपूर्ण परिवार तर उध्वस्त होतोच. शिवाय सर्वांच्या आवडीचा असलेला व्यक्ती मृत्यू पावल्यावर सर्वांना चटका लावून जातो. असाच तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुनील यांची प्राणज्योत मालवली. पंचक्रोशीतील जमलेले नातेवाईक आणि ग्रामस्थ पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देताना गहिवरले. सुनिल यांचा मृत्यू सर्वांना चटका लावून गेला.

    आष्टी तालुक्यातील देलवाडी येथील सुनील उर्फ भोजराज भिमराव कोहळे (वय 51) हे प्रचंड हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेतल्यानंतर दोन वर्षापूर्वी रोजगाराच्या शोधार्थ अमरावती येथे गेले. सगळीकडे रोजगाराची शोधाशोध केल्यावर पदरी उपेक्षाच आली. मग त्यांनी स्वतः खासगी शिकवणी टाकण्याचा निर्णय घेतला. अमरावतीच्या वडाळी भागात सुरुवात केली. गणित विषय शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. तिथून सुनील यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. आई वडील आणि दोन बहिणी या सर्व परिवाराला घेऊन ते चालत होते.

    ‘पडक्या घरास माझ्या साधी कमान नाही’, 80 वर्षाच्या आजीची सरकारकडे याचना, नृत्यांगना सायली पाटली मदतीला धावली

    अशातच शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता सुनील हे व्यायाम करत असताना अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना लागलीच खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांना होणारा प्रचंड त्रास नियंत्रणात आणला. त्यानंतर अँजिओग्राफी केली, त्यामध्ये 90% हृदयाला ब्लॉकेज निघाले. एकूण 18 ब्लॉकेज असल्यामुळे तात्काळ हृदयरोग शस्त्रक्रिया करावी लागेल, असा डॉक्टरांनी निर्णय घेतला.

    परंतु सुनील यांना बीपी असल्याने त्यांचा रक्तदाब उच्च वाढला. यासाठी अमरावती येथे बीपी नॉर्मल करण्यासाठी पाहिजे तशी व्यवस्था नाही, म्हणून तात्काळ नागपूर येथे हलवावे लागेल, असा डॉक्टरांनी सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी शनिवारली त्यांना तात्काळ नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या फुफ्फुसाला मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून खूप जास्त पाणी झाल्यामुळे आधी पाणी काढावं लागेल आणि त्यांचा रक्तदाब नॉर्मल करावा लागेल, त्यानंतरच ऑपरेशन होईल, असं सांगितलं. सुमारे 15 दिवस तिथेही भरती ठेवावे लागले.

    Maharashtra Timesपुणे अपघात प्रकरणी गौतमी पाटीलच्या अश्रूंचा बांध फुटला; म्हणाली, ‘या गोष्टीशी माझा संबंध नाही…’

    सुनील यांची तब्येत दुरुस्त होण्याचं नाव घेत नव्हते. त्यानंतर एनजीओ असलेल्या आणखी एका हार्ट हॉस्पिटल नागपूर येथेच त्यांना शिफ्ट केलं. तिथेही 15 दिवस त्यांच्यावर उपचार केले. मात्र, फुफ्फुसामधील पाणी आणि उच्च रक्तदाब नियंत्रित व्हायला बराच वेळ लागला. यामध्ये सुनील यांची प्रचंड चिडचिड झाली. त्यांना नजरेसमोर रोज हॉस्पिटलमध्ये होणारे मृत्यू पाहताना अस्वस्थ होत होते. अशातच त्यांनी पत्नी वंदना हिला विनंती केली की, मला अमरावतीला घरी घेऊन चला. ते डॉक्टरला सुट्टी मागून अमरावतीला घरी आले.

    अमरावती येथे एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 26 सप्टेंबर रोजी सुनील यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठी शस्त्रक्रिया असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तीन महिने आराम करण्याच्या सल्ला दिला. शस्त्रक्रिया झाल्यावर सात दिवसानंतर त्यांची सुट्टी झाली आणि त्यांना घरी आणलं. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी 5 ऑक्टोबरला सुनील यांना छातीत प्रचंड वेदना होऊ लागल्या. वेदनेमध्ये विव्हळत असताना पत्नी व त्यांच्या मित्रांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या हृदयरोग शस्त्रक्रियेनंतर त्यांना प्रचंड प्रमाणात बॅक्टेरिया वाढल्यानं आणि हृदयरोग शस्त्रक्रिया दरम्यान दिलेले टाके पिकल्यामुळे त्यांना बराच संसर्ग झाला. अचानक त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या, लिव्हर निकामी झाले, हृदय बंद पडलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

    Maharashtra TimesNavi Mumbai International Airport : शिवरायांच्या राज्याभिषेकासह लोककला अन् कोल्हापूर लावणी; नवी मुंबई विमानतळावर PM मोदींसमोर होणार मराठमोळा जल्लोष

    त्यांच्या मृत्यूची वार्ता देलवाडी गावात पसरतात गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. एका गरीब कुटुंबातील मुलगा अविरत संघर्ष करत झिजत होता. मात्र, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला याचा प्रत्यय सुनील यांच्या बाबतीत आला. काल सोमवारला सुनीलवर देलवाडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी देलवाडी, जोलवाडी, खंबीत, बेलोरा, अंबिकापुर, आष्टी यासह पंचक्रोशीतील नातलग, गावकरी मोठ्या संख्येने सुनील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजर होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, बहीण, जावई असा बराच मोठा परिवार आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed