• Sun. Jun 14th, 2026
    जाता-जाता पाटील आजींनी शेवटची इच्छा सांगितली, पण ‘त्याने’ डाव साधला, कुटुंब रडत म्हणतंय, किमान तिची…

    Jalgaon Old Lady ashes Stolen : या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील मेहरुन स्मशानभूमीत ही घटना घडली. आपल्या पार्थिवाला अग्नी देताना अंगावरील दागिने काढू नयेत, अशी शेवटची इच्छा पाटील आजींनी मृत्यूपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानुसार कुटुंबीयांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांसह अग्नी दिला. मात्र सोन्याच्या लालसेपोटी त्यांच्या अस्थी चोरी झाल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर महिलेचे कुटुंबीय संतापले असून सोनं सोडा, किमान रक्षा परत द्या, अशी भावनिक मागणी केली आहे.

    काय आहे प्रकरण?

    जळगाव जिल्ह्यातील गायत्री नगर येथील छबाबाई काशिनाथ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले होते. मयत छबाबाई पाटील यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले नव्हते. दुर्दैवाने याच गोष्टीचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच स्मशानभूमीतून पाटील आजी यांच्या अस्थीतील डोक्याचा, हाताचा आणि पायाचा भाग चोरून नेल्याची घटना घडली.
    Maharashtra TimesSangli Crime : कुटुंबाच्या विरोधात प्रेमविवाह, वर्षभरातच अमृता गुरवने मृत्यूला कवटाळलं, कारण ठरलं सासूच्या…
    या प्रकारामुळे जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली असून, पाटील कुटुंबीयांनी महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरच तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांनीही जळगाव महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या अस्थीही सुरक्षित नाहीत, ही लाजिरवाणी बाब असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

    कितीही काही केलं तरी नवी मुंबई पालिका निडणुकीत दिसेलच! श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना टोला

    या प्रकरणी अद्याप पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला, तरी चोरट्यांचा शोध घेणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
    Maharashtra TimesPune Accident : बाईक झाडावर आदळली, हेल्मेट असूनही मृत्यूने गाठले, पुण्यातील नवविवाहित तरुणाचा करुण अंत, पत्नीचा टाहो
    दरम्यान, पाटील कुटुंबीयांनी “सोनं नको, फक्त आमच्या आईच्या अस्थी परत करा,” अशी भावनिक मागणी केली आहे. तसेच, स्मशानभूमीत तात्काळ सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे आता पाटील आजींच्या अस्थी कुटुंबीयांना परत मिळणार का, पोलीस चोरांचा शोध घेण्यात यशस्वी होणार का, आणि या प्रकाराला भविष्यात आळा बसावा, याचा बंदोबस्त करण्यात प्रशासनाला यश येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा