• Wed. Mar 11th, 2026
    Nagpur Accident Video : ट्यूशनहून परतताना काळाचा घाला, 17 वर्षीय भाग्यश्रीचा जागीच मृत्यू, CCTV फूटेज समोर

    Nagpur News : नागपूर शहरात भीषण अपघात झाला असून तरूणीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेमकी घटना कुठे आणि कशी घडली जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : शहरात पुन्हा एकदा बेफाम वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका निरपराध तरुणीचा जीव गेला आहे. आज (मंगळवार) सकाळी खरबी चौकात घडलेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय भाग्यश्री जियालाल टेंबरे (रा. मा. आंबे कॉलनी, गरीब चौकाजवळ, नागपूर) हिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

    मंगळवारी सकाळच्या सुमारास भाग्यश्री ट्युशनवरुन घरी परतत असताना एका खाजगी बसने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड जोरदार होती की ती काही अंतरावर फेकली गेली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला, मात्र वाठोडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बस जप्त केली आणि चालकाला अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : चॉकलेटचं आमिष देऊन चिमुकलीला पाचव्या मजल्यावर नेलं, घरातील पाणी संपलं म्हणून महिला वर गेल्या तर…
    अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले. त्यांचे म्हणणे आहे की, खरबी चौकात वाहतुकीचा प्रचंड ताण असूनही येथे योग्य पादचारी सुविधा नाहीत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मार्ग अरुंद झाला आहे, त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडतात. स्थानिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, या रस्त्यावरून मोठ्या खाजगी बसेस आणि ट्रक वारंवार ओव्हरलोड होऊन धावत असतात. त्यामुळे स्थानिकांना नेहमीच भीतीच्या सावटाखाली रहावे लागते. त्यांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल, स्पीड ब्रेकर आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
    Maharashtra TimesNagpur Crime : शेतात काम करण्यासाठी निघाले, सायंकाळी पुन्हा परतलेच नाही, कुटुंबाने शोध घेतला तर…; धक्कादायक दृश्य समोर
    दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. तपास सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपूर शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेपर्वा वाहनचालक आणि अतिक्रमण हे मृत्यूंचे प्रमुख कारण बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा