• Wed. Mar 11th, 2026
    ‘गरज असल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही’, मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य चर्चेत

    महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबाबत केलेल्या नव्या वक्तव्यामुळे आता पुन्हा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. “मी गरज पडल्यास हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं. ते हिंदी भाषिकांना संबोधितल करत असताना बोलत होते.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी-मराठी वाद पुन्हा शिगेला पेटण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. भाषेनिहाय प्रांतरचना झाली. त्यानुसार महाराष्ट्रात मराठी ही राज्य भाषा आहे. पण महाराष्ट्राच्या मुंबईतच मराठी भाषेला कमी लेखण्याचा किंवा मुंबईत मराठी सक्तीची नाही, असा मेसेज देणारे वक्तव्य सातत्याने समोर आले आहेत. प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषा ही मुंबईची बोलीभाषा झालीय, असं वक्तव्य करत वाद ओढवून घेतला होता. यानंतर त्यांना प्रतिकारही सोसावा लागला होता. मीरा रोड येथे निघालेल्या मराठी मोर्चात प्रताप सरनाईक यांच्या दिशेला आंदोलकांनी बॉटल भिरकावली होती. यानंतर आता प्रताप सरनाईक यांच नवं वक्तव्य समोर आलं आहे.

    “मी गरज असल्याल हिंदीत बोलतो, मला फरक पडत नाही”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. अर्थात महाराष्ट्रात मराठी बोलणं आवश्यक आहे. मराठी बोलता येत नसेल तर ती भाषा शिकणं आवश्यक आहे. मराठी बोलण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. पण आता मंत्रीच उघडपणे गरज असल्यास हिंदीत बोलतो, आपल्याला फरक पडत नाही, असं वक्तव्य करताना दिसत आहेत. अर्थात गरज पडल्यास हिंदी सर्वांनाच बोलावी लागते. पण अशा वक्तव्यातून सरनाईक यांना हिंदी भाषिकांना खूश करण्याचा प्रयत्न राजकारणात अंगलटी येऊ शकतो. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

    प्रताप सरनाईक काय म्हणाले?

    “हे विविध जाती, धर्माच्या नागरिकांचं शहर आहे. मी आयुक्तांना म्हटलं होतं की, तुम्ही काळजी करु नका. मराठी-हिंदी वाद जो असेल तो असेल. पण तुम्ही हिंदीमध्ये बोललात तरी चालेल आणि लोकांना सुद्धा कळेल. मी सुद्धा भले मराठी आमदार असेन तरी मी माझ्या सर्वसामान्य जनतेबरोबर ज्या ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेस हिंदीत बोलेन. मला फरक पडत नाही”, असं प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली.

    किशोरी पेडणेकर यांची टीका

    “ही कुठली आगतिकता? म्हणजे मराठीची गळचेपी झाली तरी चालेल. ठिक आहे, त्या ज्या कुणी आयएएस अधिकारी असतील, त्यांना येत नसेल. येत नसेल तर शिका. बोलण्याचा प्रयत्न करा. हे काय सांगतात तर चालेल? म्हणजे तुम्ही चारही बाजूंनी ढोल वाजवायची पद्धत आहे. मराठीची गळचेपी झाली तरी चालेल. हिंदी भाषिकांना खूश करण्यासाठी काहीही करु”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा