Nagpur Murder News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मका चोरीच्या संशयावरुन एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या शेतकऱ्याचा मृतदेह शेतात असलेल्या खड्ड्यातील पाण्यात आढळून आला आहे. या घटनेनं संपूर्ण नागपूर जिल्हा हादरला आहे.
प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मनीष काठुलाल उईके याला संशय होता की त्याच्या मका पिकाची चोरी होत आहे. याच संशयावरून त्याने वामन इरपाची यांच्याशी वाद घातला. हा वाद काही क्षणांतच चिघळला आणि मनीषने संतापाच्या भरात लाठीनं वामन यांच्यावर तुटून पडत निर्दयपणे मारहाण केली. या जबर मारहाणीमुळे वामन यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने आपला मानसिक तोल सुटल्याचा सांगत मृतदेह पाण्याच्या खड्ड्यात फेकला, जेणेकरून गुन्हा लपवता येईल. परंतु काही तासांनंतर त्याचे धैर्य सुटले आणि त्याने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं.
Ahilyanagar Crime : लग्नाचं आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध, नंतर मानसिक छळ; लग्नाला नकार देताच क्रीडा क्षेत्रातल्या तरुणीचं टोकाचं पाऊल
घटनेची माहिती मिळताच सावनेर उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ) सागर खर्डे, ठाणे प्रमुख आशीष ठाकूर तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जागेची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मनीष उईके विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या क्रूर हत्येमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. केवळ मका पिकासारख्या किरकोळ वादातून एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा जीव जाण्याची घटना ग्रामस्थांना हादरवून गेली आहे. समाजात वाढत चाललेली असहिष्णुता आणि संवेदनशून्यता यावर या घटनेने पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

