• Sat. Jun 6th, 2026
    रायगड जिल्ह्याच्या राजकारणात डोंबाऱ्याचा खेळ! शिंदेंच्या आमदाराला तटकरेंच्या शिलेदाराचं प्रत्युत्तर

    Raigad Politics : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चांगलीच शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक लढाई बघायला मिळत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : “रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खासदार सुनील तटकरे तब्बल 40 वर्षांपासून म्हणजे 1992 सालापासून सक्रिय आहेत. रायगडची जनता त्यांना वारंवार आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे. जे सुनील तटकरे यांच्या पायाला हात लावून मोठे झाले त्यांनी त्यांच्यावर टीका करण्याची ही जी काय आता नवीन शृंखला चालू केलेली आहे ती कुठेतरी थांबवावी, अन्यथा त्यांना याच्याही पेक्षा परखड शब्दांमध्ये भविष्यात उत्तरे दिली जातील”, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना दिली. महेंद्र दळवी यांनी रोह्यात येऊन सुनील तटकरेंवर टीका केली होती. त्याला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

    “हा डोंबाऱ्याचा खेळ डोंबार या सकट जे तिथे जाऊन करतायेत त्यांनी तो थांबवावा आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच सांगतो, अलिबागच्या आमदारांना माझी सूचना राहील, आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही. आम्हाला तुमच्यावर झालेल्या ४९८ च्या खटल्याबद्दल बोलायचं नाही, जो तुमच्या पत्नीने आपल्यावर दाखल केला होता. डोमेस्टिक व्हायलन्स (घरगुती हिंसाचा). त्याच्यावर आम्हाला आज बोलायचं नाही किंवा एमएसईबीचे खांब चोरले म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला. याच्यावर सुद्धा आम्हाला आज बोलायचं नाही”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

    “जर वेळ आली तर पुन्हा एकदा रोहेकारांचं सोडा पण अलिबागकरांना सुद्धा आठवण करून द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबागमध्ये येऊन तुम्हाला उत्तर देईल एवढंच या निमित्ताने सांगतो”, अशा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी दिला.

    महेंद्र दळवी काय म्हणाले होते?

    महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणलेल्या योजना आणि कामांचं सुनील तटकरे श्रेय घेतात, असा आरोप दळवी यांनी केला होता. तसेच “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत आली तर ठिक आहे. पण या नालायकांसोबत जाणार नाही”, अशी खोचक टीका महेंद्र दळवी यांनी केली होती.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा