• Wed. Jun 17th, 2026
    खेडेकरांचा भाजप प्रवेश रोखण्यामागे खुद्द राज ठाकरे? आयुष्याच्या पुस्तकाचं एक पान काय फाटलं… स्टेटसची चर्चा

    Raj Thackeray : दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून वैभव खेडेकर यांचा भाजपप्रवेश थांबवल्याची चर्चा सध्या उघडपणे सुरु आहेत.

    वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे कोणे एके काळचे कोकणातील शिलेदार वैभव खेडेकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मनसेमधून बडतर्फ करण्यात आलं. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. भाजपचे युवा नेते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे सहसंपर्क मंत्री नितेश राणे यांनी या प्रवेशाची थेट घोषणाच गणेशोत्सवात खेडमध्ये येऊन करुन टाकली. मात्र या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप त्यांना लाभलेला नाही.

    वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश नक्की कोणी रोखला? यामागे कोणाचा हात आहे? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून हा पक्षप्रवेश थांबवल्याची चर्चा सध्या उघडपणे सुरु आहेत. हा पक्षप्रवेश लांबला असला तरी खेडेकरांचा भाजपप्रवेश निश्चित असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु हा प्रवेश नक्की कधी होईल याबाबत संभ्रम कायम आहे.

    राज ठाकरे व उद्धव ठाकरे सध्या कौटुंबिकदृष्ट्या एकत्र आले आहेत, मात्र राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही राजकीय घोषणा झालेली नाही. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका या महायुतीसाठी महत्त्वाच्या आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळेच राज ठाकरे भाजपबरोबर आल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल, अशी चर्चा आहे. राज ठाकरे यांनी बडतर्फ केलेल्या वैभव खेडेकर, अविनाश सौंदळकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश कार्यक्रम पुढे ढकलल्याची चर्चा आहे.

    वैभव खेडेकर यांचा भाजपा पक्षप्रवेश लांबवण्यात भाजपमध्ये असलेल्या काही जुन्या जाणत्या नेत्यांचाही हात असल्याची चर्चा आहे. वैभव खेडेकरांना दापोली मतदारसंघातून भाजपमध्ये प्रवेश दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत ठिणगी पडू शकते. शिवसेना भाजप वेगळी लढल्यास वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळेल, ही भीती ‘बाशिंग बांधून असलेल्या’ काही इच्छुकांना असल्यानेच त्यांचाही हातभार यासाठी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा पक्षप्रवेश लांबवण्यात स्थानिक राजकारणाचीही किनार आहे. या संदर्भात भाजपच्या स्थानिक पातळीवरून नेत्यांकडून कोणत्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत हीच बाब बोलकी आहे.

    वैभव खेडेकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत भेटीचा आणि गाड्यांच्या ताफा असलेला व्हिडिओ स्टेटसला ठेवला होता. दहशत तर डोळ्यात असली पाहिजे.. हत्यार तर हवालदाराकडे पण असते.. असं स्टेटस ठेवलं होतं. आयुष्याच्या पुस्तकाचं एक पान काय फाटलं, तर लोकांना वाटलं यांचा कार्यकाळ संपला आहे, पण महाराज काय सांगतात, ज्या वेळेला लोकांना वाटतं ना, आपण संपलोय, त्यावेळेस एक बाकी संयमाचा डाव टाकायचा असतो, असा व्हिडिओ खेडेकर यांनी आज स्टेटसला ठेवला आहे. “मैत्रीत विश्वास असेल तर कोणतीही अडचण लहान वाटते” असं सांगत त्यांनी बरोबर असलेल्या पदाधिकारी त्यांचे फोटो ठेवले आहेत.

    यापूर्वी हा पक्षप्रवेश 4 सप्टेंबर रोजी होणार होता मात्र तो काही कारणाने रद्द झाला, मात्र आता दुसऱ्यांदा 23 सप्टेंबर रोजी होणारा पक्षप्रवेशही रद्द झाला. पण तरीही खेडेकर यांचा राजकीयदृष्ट्या हा अपमानच झाला हे स्पष्ट आहे. या अपमाननंतर खेडेकर यांची समजूत घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विनय नातू यांनीही नुकतीच वैभव खडेकर यांची भेट घेतली आहे.
    Maharashtra TimesVijay Kumar Malhotra : मनमोहन सिंह यांना पराभूत करणारा नेता कालवश, दिल्ली भाजपच्या पहिल्या अध्यक्षांचं निधन
    दरम्यान खेडेकर यांना तुम्ही काम सुरू करा पक्षप्रवेश लवकरच निश्चित केला जाईल असे आदेश भाजप पक्षश्रेष्ठींकडून वैभव खेडेकर यांना देण्यात आले आहेत. मात्र यामध्ये आता यामध्ये कोणीही कितीही अडथळे आणले तरी खेडेकर माघारी फिरणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ मानली जाते.

    कार्यकर्त्यांसोबत बसून मी माझी भूमिका स्पष्ट करणार; वैभव खेडेकर भाजपमध्ये जाणार?

    वैभव खेडेकर हे जर मनसे पक्ष नेतृत्वासाठी इतके महत्त्वाचे होते तर त्यांची तडकाफडकी बडतर्फी करताना विचार करायला हवा होता अशा प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत. राज्यातली मनसेची पहिली, कोकणातील खेड नगरपरिषद एकहाती आणली ती वैभव खेडेकर यांनीच. थेट भिडणारा कार्यकर्ता अशी त्यांची खास खेडेकर स्टाईल ओळख आहे. त्यामुळे एकंदरच सध्या खेडेकर यांचा दोनदा रद्द झालेला पक्षप्रवेश हा अवघ्या कोकणात चर्चेचा विषय ठरला आहे.
    Maharashtra TimesPune News : जिल्हाधिकारी-पोलीस अधीक्षकांना 15 लाखांपर्यंत गाडी, दिवाळीपूर्वी नव्या कार दिमतीला, अट फक्त…
    भाजपाचे काम यापूर्वीच सुरू केलं आहे, प्रवेश ही एक औपचारिकता आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया खेडेकर यांनी यापूर्वीच दिली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वीच भाजपासाठी काम सुरू केलं असून आता जाहीर प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. मात्र या पक्षप्रवेशाला आता कोणता मुहूर्त लाभतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा