• Sat. Mar 7th, 2026
    ट्रक आणि कार मध्ये जोरदार धडक, कारचा चेंदामेदा अन् वृद्धेसह एकाचा वेदनादायी अंत
    वर्धा
     वर्ध्यात नागपूर-तुळजापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत कारमधील दोघे जण ठार झाले आहेत. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना वर्ध्याच्या इव्हेंट मंगल कार्यालयाजवळ घडली. मृतकांमध्ये एक वृद्ध महिला व पुरुषाचा समावेश आहे.कमल शंकरसिंग ठाकूर या 85 वर्षीय महिला आलोडी येथील गजानन तिडके या दोघांचा जीव गेला आहे. तर अवंतिका ठाकूर, अनुप्रिया ठाकूर आणि दीपक हे जखमी झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.

    वर्ध्यातील पाच जण काही कौटुंबिक कार्यासाठी नागपूर येथे गेले होते. नागपूर येथून परत येत असताना वर्ध्यालगत ईव्हेन्ट मंगल कार्यालयाजवळ कार वरील नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडर क्रॉस करून पलीकडे गेली. समोरून येणाऱ्या ट्रकला कारची धडक लागली. भीषण अपघातात कार समोरून चेंदा मेंदा झाली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत कार चांगलीच क्षतीग्रस्त झाली. जखमींना तत्काळ सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी देखील सामाजिक भान जपत, जखमींना रुग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

    महामार्गावरील अपघातांच्या मालिका सुरूच आहे. जळगावमध्येही भयानक अपघात घडला. दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन यात अनेकांचा मृत्यू होत असतात. यातच मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील पुरनाड फाट्याजवळ शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगानं येणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्याला दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्यासोबतच त्यांच्या मुलीलाही डंपरने चिरडले. यामध्ये तिघांचाही वेदनादायी अंत झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed