• Tue. Mar 10th, 2026
    Thane News: अतिक्रमणांना पायबंद; महसूल आणि भूमी अभिलेख विभाग करणार सरकारी जागांचे सर्वेक्षण

    Thane News: कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणे रोखण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २००५च्या खारफुटींच्या स्थितीनुसार सर्वेक्षण करण्यात आले आहे. कांदळवन कक्षाकडून यासंदर्भातील कारवाई सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

    अतिक्रमण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    ठाणे: ठाणे जिल्ह्यातील सरकारी जागांवर अतिक्रमणे, सरकारी जागांचा दुरुपयोग केले जाण्याचे प्रकार समोर येत असून, हे रोखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सरकारी जागांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    ‘जीआयएस’ प्रणाली आधारित ‘गव्हर्नमेंट लँड डेटा बँक’ तयार करण्यात येत असून, ती गुगल अर्थसोबत जोडली जाणार आहे. यामुळे सरकारी जागांवरील अतिक्रमणे, विकासकामे यांची माहिती तत्काळ उपलब्ध होऊ शकणार आहे. शहापूर आणि भिवंडी तालुक्यांत या दृष्टीने महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून कामे सुरू करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
    Maharashtra TimesThane News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळव्यात अजित पवारांना झटका, माजी नगरसेवक ‘राष्ट्रवादी शप’ पक्षामध्ये
    ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहरातील वाहतूककोंडी, अतिक्रमणे, पर्यावरणाचा ऱ्हास , पर्यटन विकास आणि विविध विकासकामांवर त्यांनी व्यापक चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून सरकारी जागेतील अतिक्रमणे रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

    महापालिकांमध्ये सुरू असलेल्या अतिक्रमणांच्या अनुषंगाने त्यांच्याशी पत्रव्यवहार करून अतिक्रमणे रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी पांचाळ यांनी स्पष्ट केले. कल्याण-डोंबिवलीतील ६५ अनधिकृत बांधकामांपैकी पाच जागा सरकारी मालकीच्या असून, तेथे अटी शर्थींचा भंग झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

    मामा घाबरू नका, मी तुमच्यासोबत; भाजप कार्यकर्त्यांच्या साडी प्रकरणानंतर राहुल गांधींचा फोन

    जिल्ह्याचा पर्यटन आराखडा
    ठाणे जिल्ह्यातील ३९ पर्यटनस्थळांचा आराखडा तयार करण्यात आला असून, तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्रॉली कार्यान्वित करणे, माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबरोबरच माहुली, येऊर, थितबी या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून पर्यटनस्थळांच्या विकासाचे प्रयोजन आहे. जिल्हा नियोजन, वन विभाग आणि पर्यटन विभागाकडून या दृष्टीने निधी मिळवण्यात येणार आहे.
    Maharashtra TimesThane Crime : BF च्या मदतीने पतीला मारून खाडीत फेकलं, पण एका दोरीने सर्व बदललं; ठाण्यातील थरारक घटना
    वाहतूककोंडी फोडण्यासाठी सल्लागार
    ठाणे जिल्ह्यातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटील असून, रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून याकडे लक्ष दिले जात आहे. जिल्ह्यातील वाहतूक समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनेसाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा विचार आहे. त्यानुसार काही संस्थांकडून यासंदर्भात प्रात्यक्षिके दाखवली जात आहे. ड्रोन आणि अन्य अत्याधुनिक यंत्रणांच्या साह्याने सर्वेक्षण करून त्यानुसार त्यावरील उपाययोजना आखल्या जाणार आहेत. याशिवाय सल्लागार संस्थांकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे वाहतूककोंडीस जबाबदार प्राधिकरणांना पत्र पाठवून कोंडी सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

    जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार, मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालय असे तीन पोलिस आयुक्तालय, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक क्षेत्र, महामार्ग पोलिस प्रशासन, याशिवाय महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी या नियोजन प्राधिकरणांशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा