नागपूर
पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने ‘एक हजार घरांपर्यंत पोहोचा आणि महापालिकेची मिळविण्यासाठी पात्र व्हा’ अशी आकर्षक योजना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी कार्यकत्यांसमोर मांडली.
‘शहरातील प्रत्येक बुथवरून किमान शंभर पदवीधरांशी संपर्क केला पाहिजे. त्यांची नोंदणी केली पाहिजे. जो सक्रिय कार्यकर्ता, पदाधिकारी आहे त्याने किमान हजार घरांशी संपर्क केला पाहिजे. हजार घरांपर्यंत संपर्क साधून नोंदणी करणारी व्यक्ती महापालिका उमेदवारी निवडणुकीसाठी मागण्यास पात्र समजली जाईल’, असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. भाजपने या निवडणुकीसाठी नोंदणीप्रमुख म्हणून माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. या निवडणुकीत नोंदणीप्रमुख हाच उमेदवार असल्याचे संकेत असल्याने कोहळे हेच पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीचे उमेदवार मानले जात आहेत. तसेच या माध्यमातून पक्ष आता ओबीसी चेहरा देणार असल्याची चर्चा आहे.
बावनकुळेंचे पाच हजार
‘तुम्ही एक हजार मतदारांची नोंदणी करा, मी पाच हजार मतदार नोंदवितो’, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ‘अशी मॉबने नोंदणी आपणास अपेक्षित नाही. तुम्ही घरोघरी जा. पदवीधरांशी बोला आणि त्यांची नोंदणी करा’, असा सल्ला रवींद्र चव्हाण यांनी दिला. आजी-माजी प्रदेशाध्यक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकेने कार्यकर्ते मात्र चक्रावले.
मदतीवरून राजकारण नको
राज्यातील सहा जिल्ह्यांमधील पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी एक महिन्याचे वेतन आपत्तीग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सहा महिन्यांचे वेतन मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, राजकारण म्हणून याकडे बघण्यात येऊ नये असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. ‘काही आमदार प्रचंड गडगंज असतात’, असा टोलाही चव्हाण यांनी कुणाचे नाव न घेता लगावला.
