• Thu. Mar 12th, 2026

    शरद पवारांची गाडी अडवली अन् विषय थेट फडणवीसांच्या कानावर घालायला सांगितला, पुण्यात नेमकं काय घडलं?

    शरद पवारांची गाडी अडवली अन् विषय थेट फडणवीसांच्या कानावर घालायला सांगितला, पुण्यात नेमकं काय घडलं?

    Pune News: शरद पवार यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान कात्रज येथे रिंगरोड बाधित नागरिकांनी त्यांची भेट घेतली आहे. यावेळी प्रस्तावित रिंगरोडमुळे बाधित होणाऱ्या घरांबाबत त्यांनी शरद पवारांकडे आपली व्यथा मांडली आणि या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत त्यांचे म्हणणे पोहोचवण्याची मागणी केली.

    शरद पवारांची गाडी अडवली अन् विषय फडणवीसांच्या कानावर घालायला सांगितला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजीत दराडे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आले असता कात्रज येथील गुजर निंबाळकर वाडी परिसरात नियोजित कार्यक्रमाला जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांची गाडी थांबवून आपली व्यथा मांडली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याची मागणी केली.

    वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांमुळे दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पुणे रिंग रोड प्रकल्प राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या तब्बल ८३ गावांना थेट जोडणारा सहा ते आठ लेनचा आधुनिक महामार्ग तयार होणार आहे. रिंग रोड दोन टप्प्यांत विभागला असून आंतरिक रिंग रोड (PMRDA) आणि बाह्य रिंग रोड (MSRDC) अशा दोन विभागांत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. बाह्य रिंग रोडसाठी डिसेंबर २०२४ मध्ये कामाला सुरुवात झाली असून सुमारे ७० ते ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. आंतरिक रिंग रोडसाठी पहिल्या टप्प्यातील दहा गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

    या प्रकल्पाचा मार्ग कात्रजजवळील गुजर निंबाळकर वाडी भागातून जाणार असून यामुळे स्थानिकांच्या काही घरांना बाधा येणार आहे. रहिवाशांचे म्हणणे आहे की, पूर्वी या भागातून रस्ता जाणार नसल्याचे त्यांना कळविण्यात आले होते. मात्र आता नव्या आराखड्यानुसार प्रस्तावित रस्ता थेट त्यांच्या घरांच्या जागेतून जाणार आहे. या परिसरातील सुमारे पंचवीस कुटुंबांनी महाराष्ट्राच्या विविध भागातून, काहींनी बारामतीहून येऊन येथे स्थायिक होत काही कोटी रुपयांचे बंगले उभे केले आहेत. “आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आमची घरं उद्ध्वस्त झाली तर आमचं मोठं नुकसान होईल. आमची घरं वाचवण्यासाठी हा मार्ग बदलावा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत हा मुद्दा आपण पोहोचवावा,” अशी मागणी रहिवाशांनी शरद पवारांसमोर केली.

    दरम्यान, नागरिकांनी या संदर्भात शरद पवारांना निवेदन दिलं. त्यांनी नागरिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलं आणि आवश्यक त्या पातळीवर लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. दरम्यान, रिंग रोड प्रकल्पामुळे भविष्यात पुण्यातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असला, तरी ज्यांची घरं बाधित होत आहेत त्यांच्यात चिंतेचं वातावरण आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा