Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, भूम व परंडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ९२ गावांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून बचावकार्यासाठी लष्कर, एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवान कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले असून, तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.
बचावकार्य वेगाने सुरू
पूरग्रस्त भागात भारतीय लष्कर, एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टर व बोटींच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ६५ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर लाखो गावांतील १२ जणांना बोटीने, रुई येथील १३ जणांना बोटीने, वडनेर-देवगाव (खु.) येथील २६ जणांना हेलिकॉप्टरने, भूम तालुक्यातील तांबेवाडीतील ६, इट येथील १ व इडा येथील ७ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील घाटपिंपरी,वागेगव्हाण व वडनेर परिसरात सुमारे १५० नागरिकांची जवानांनी सुटका केली. देवगाव (खु.) येथे परंडाचे आमदार तानाजी सावंत यांनी आज भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
पावसाचं थैमान! हजारो डोळ्यांमध्ये पाणी, मराठवाड्यात हाहा:कार, गावांना पुराचा वेढा, हेलिकॉप्टरने बचावकार्य
प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार हे पूरग्रस्त भागात असून यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे, तहसीलदार निलेश काकडे यांच्यासह महसूल, पोलीस व आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पूरग्रस्त भागात तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते पूरग्रस्त भागातील गावात पाहणी करत आहेत.
शेतीपिकांचे मोठे नुकसान
२० ते २२ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ६४ हजार २९ शेतकऱ्यांचे पीके बाधित झाली आहेत. यात प्रामुख्याने जिरायत पिके तर काही प्रमाणात बागायती पिकांनाही फटका बसला आहे.
पाझर तलाव फुटले
भूम तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक पाझर तलाव फुटले असून वारेवडगाव, पाठसांगवी, हिवरडा, वालवड चुंबळी, मोहिते नगर वालवड व वालवड पाझर तलाव बाधित झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हवामान विभागाचा इशारा
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी जनावरे व कुटुंबियांसह सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

