• Tue. Jun 9th, 2026

    तिशीतल्या मुलाचा मृत्यू, सून पाच महिन्यांची गरोदर अन्… ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्याची हृदयद्रावक कहाणी, वडिलांचा निरोप घेण्यासाठी…

    तिशीतल्या मुलाचा मृत्यू, सून पाच महिन्यांची गरोदर अन्… ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्याची हृदयद्रावक कहाणी, वडिलांचा निरोप घेण्यासाठी…

    Sushma Andhare Facebook Post : परशुराम जाधव यांच्यासारख्या निष्ठावानांमुळे शिवसेना संपलेली नाही, असं सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंं आहे.

    परशुराम जाधव यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट सुषमा अंधारे यांनी घेतली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या कुटुंबातील अत्यंत हृदयद्रावक प्रसंग सांगितला आहे. तिशीतला मुलगा मृत्यूशय्येवर असतानाही जाधव 700 किलोमीटरचा प्रवास करून पक्षाच्या बैठकीसाठी बीडला गेले आणि मुंबईला परतताच लेकाने प्राण सोडले. त्याची पत्नी पाच महिन्यांची गरोदर आहे, अशी मनावर काटा आणणारी सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितली आहे. जाधवांसारख्या निष्ठावानांमुळे शिवसेना संपलेली नाही, असंही अंधारे म्हणतात.

    सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट काय?

    ईडीच्या धाकाने 40 लोक निघून गेले. ज्याच्यावर अगदी भावासारखा विश्वास टाकला, त्यानेच नेता मरणासन्न अवस्थेत असताना गद्दारी करत सत्ता बळकावली. स्वायत्त यंत्रणांचा दुरुपयोग करत आधी साथीदार, मग पक्षाचे नाव, मग चिन्ह एकेक करून त्यांनी सगळं काढून घेतलं. पण तरीही शिवसेना संपत का नाही? या चार अक्षरी शब्दांमध्ये अशी काय ताकद आहे की त्यांनी कितीही वेळा खुडून काढायचा प्रयत्न केला तरी नवीन धुमारे पुन्हा पुन्हा फुटत राहतात तर त्याचं कारण परशुराम जाधव यांच्यासारखे निष्ठावंत लोक. परशुराम जाधव. अत्यंत सामान्य आर्थिक स्थिती असणारा गेली 30 वर्ष शिवसेनेला आयुष्य वाहून घेतलेला निष्ठावंत शिवसैनिक. गेली तीन महिने परशुराम जाधव यांचे सुपुत्र प्रताप जाधव वय वर्ष 32 हे मृत्यूशय्येवर होते. घरातली आर्थिक ओढाताण. मुलाचं आजारपण. लग्नाच्या चार वर्षानंतर सुनबाईला दिवस गेलेले. ती पाच महिन्याची गरोदर. सबंध कुटुंबाचा डोलारा परशुराम जाधव यांच्या अंगावर. अन् त्यातच बीड सारख्या अत्यंत संवेदनशील जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी.
    Maharashtra TimesUddhav Thackeray : तातडीने माहिती काढा आणि मला कळवा; ‘मातोश्री’वरील हायव्होल्टेज बैठकीत उद्धव ठाकरेंचा एक प्रश्न, म्हणाले नंतर घोळ व्हायला नको…
    10 आणि 11 तारखेला पक्षाने तातडीची बैठक बीडमध्ये बोलावली. नेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती. खरंतर परशुराम जाधव या बैठकीला उपस्थित नाही राहिले तरी पक्षात त्यांना कोणीही बोल लावला नसता मात्र पक्षाने अत्यंत विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकली आणि आपण त्याला बांधील आहोत. कुटुंबातल्या कुठल्याही अडचणींना पुढे करत आपण या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, ही कर्तव्यनिष्ठा त्यांच्या ठाई. रातोरात ते मुंबईहून बीडच्या बैठकीसाठी पोहोचले तब्बल दोन दिवस बैठकीसाठी वेळ दिला. मुलगा अक्षरशः व्हेंटिलेटर वर होता!

    कोरोना काळात हजारो रुपये लाटले, मुंबईकरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं; फडणवीसांनी ठाकरेंना घेरलं!

    12 तारखेला 700 किलोमीटरचा प्रवास करून ते पुन्हा मुंबईमध्ये पोहोचले. 13 तारखेला प्रतापने प्राण सोडला. जणू आपल्या वडिलांचा निरोप घेण्यासाठीच तो थांबला होता!
    Maharashtra TimesMaharashtra Politics : युतीच्या चर्चेत राज ठाकरेंचं पारडं जड? उद्धव ‘दादू’ बॅकफूटवर जाण्याची चिन्हं, तो मुद्दा ठरणार गेमचेंजर
    त्यांच्या घरी सांत्वन भेटीसाठी म्हणून गेले होते. अत्यंत साधारण परिस्थितीतलं कुटुंब. कुठलाही पुढारीपणाचा बडेजाव नाही. लेकी सुना , भाऊ, भावजया मुंबईसारख्या ठिकाणी पंधरा-वीस लोकांचे हे कुटुंब. आजूबाजूला जमलेले नातेवाईक सुद्धा सगळे अत्यंत कष्टकरी लोक. जिचा नवरा गेलाय ती पाच महिन्याची पोटूशी सून बाळ. अशा लोकांचे आपण सांत्वन तरी काय आणि कुठल्या शब्दात करावं?

    लाखो करोडो रुपये खर्च करण्याची क्षमता असणाऱ्यांमुळे शिवसेना उभी नाही. प्रसंगी आपल्या कुटुंबाला सुद्धा बाजूला ठेवत पक्षाला प्राधान्यक्रम देत या पक्षासाठी अहोरात्र काम करणाऱ्या परशुराम जाधव सारख्या लोकांमुळे शिवसेना उभी आहे. दादा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. जेव्हा कधी माझ्यात काही करण्याची क्षमता निर्माण होईल तेव्हा माझी पहिली जबाबदारी असेल अशा सगळ्या अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक लोकांच्या साठी ताकदीने उभं राहणं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा