• Sun. Jun 14th, 2026
    मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे तुमचा हात? अखेर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, कवडीचाही…

    Nashik Sharad Pawar: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून होणाऱ्या आरोपांना शरद पवारांनी उत्तर दिलं असून छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं आहे.

    मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे तुमचा हात? आरोपावर अखेर शरद पवार पहिल्यांदाच बोलले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील दोन वर्षांपासून मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यभरात रान पेटवलं आहे. जरांगे पाटील यांच्याबाबत वेगवेगळे दावे केले जात असताना ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून काम करतात, असा आरोप महायुतीतील नेत्यांकडून वारंवार केला जातो. या आरोपावर शरद पवार यांनी नाशिक इथं बोलताना स्पष्ट भूमिका मांडत जरांगे यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

    “कुणी काही म्हणत असले तरी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नाही. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिले आहे. मात्र या ऐक्याला तडा बसतोय,” अशी चिंता शरद पवार यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केली. तसंच “समाजा-समाजात कटुता नको ही काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रित चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. हे याच्यासाठी, ते त्याच्यासाठी असं करणं सरकार म्हणून हे योग्य नाही. वेगवेगळ्या समाजाच्या समित्या बनवल्या जात आहेत. सरकार एका जातीचे, एका समाजाचे नाही तर सर्वांचे आहे. समित्यांच्या नियुक्त्या करताना व्यापक दृष्टिकोन ठेवायला हवा. एकच समिती असावी असे माझे म्हणणे नाही. परंतु कमिटी एका जातीची नको,” असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

    छगन भुजबळांना सल्ला

    मराठा समाजाची कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणामध्ये एंट्री होत असल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर भाष्य करत शरद पवार यांनी भुजबळांना सल्ला दिला आहे. आम्हाला सामाजिक ऐक्य हवं आहे. त्यासाठी काही व्यापक कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्हाला एका जातीचे राजकरण जमत नाही. समाजा-समाजात अंतर वाढेल असे भाष्य करणे योग्य नसल्याचा सल्ला पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला आहे.

    दरम्यान, “पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला ते पाहता पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे आहे. ‘खून और पाणी सात मे नही बहेगा’ असे भाजपचे नेते सांगत होते. आता ते क्रिकेट खेळत आहेत. भाजप महिन्याला धोरण बदलते आहे,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नाशिकमध्ये केली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा