Chhatrapati Sambhajinagar News : खुलताबादच्या वेरूळ घाटात आयशर आणि ट्रकच्या भीषण अपघातात सासू-जावई जागीच ठार झाले. बॉयलर ट्रक पलटी झाल्याने दुचाकीवरील हे दोघे ट्रकखाली दबले. दोघांचाही काहीच न कळता त्यांच्यावर काळाचा घाला पडला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कचरू सांडू त्रिभुवन (वय ४० रा. वेरूळ), चंद्रभागाबाई आसाराम भालेराव (वय ५७ रा. राजीव गांधी नगर) खुलताबाद अशी अपघातात मृत पावलेल्या सासू जावयाची नाव आहेत. वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून वेरूळ घाटात जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जड वाहतूक केली जात नाही. मात्र गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सांडू त्रिभुवन हे सासू चंद्रभागाबाई भालेराव यांना खुलताबाद येथे सोडण्यासाठी दुचाकीने (एम एच २०जी पी १४०४) निघाले होते. याचवेळी वेरूळ घाटात कन्नड येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या आयशर (एम एच.४२ ए.क्यू.९६४६) ट्रक जात होता. ट्रकचालक रस्त्याने धोकादायक पद्धतीने गाडी चालवत होता. याची कल्पना रस्त्यावरील इतर वाहन चालकांना आली होती.
धक्कादायक म्हणजे एम एच.४० सी.क्यू.७३५५ या क्रमांकाचा १६ चाकाचा ट्रक देखील खुलताबाद येथून कन्नडकडे जात होता. हे दोन्ही ट्रक समोरासमोर येऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ट्रक हा रस्त्यावर पडला. याचवेळी सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासू चंद्रभागा या ट्रकच्याखाली दबल्या गेल्या. यामध्ये दोघांचा जागीच दुर्दैवी अंत झाला आहे. स्थानिक शेख मसउद्दीन यांनी तात्काळ दोघांना खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दौलताबाद येथे उरूस सुरू आहे. वेरूळ येथील भोसले चौक ते दौलताबाद टी पॉइंट रस्ता जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांना नेमणूक केला आहे. मात्र असे असतानाही जड वाहतुकीचा टँकर या रस्त्याने वाहतूक करत होता. याच ट्रकमुळे हा भीषण अपघात झाला. पोलीस बंदोबस्त असताना ट्रक कसा शिरला? याला जबाबदार कोण? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सतीश लोखंडे यांनी उपस्थित केला आहे.

