नेपाळमध्ये ‘जेन झी’ आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अराजक स्थितीत सुमारे एक हजार भारतीय पर्यटक अडकले आहेत, ज्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या ११२ पर्यटकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. सध्या, केंद्र सरकार नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून पर्यटकांना मदत पुरवण्याचे काम करत आहे.
अन्नपूर्णा शिखराचे दर्शन, पशुपतिनाथाचे दर्शन, गुप्तेश्वर महादेव गुंफेची सैर, एव्हरेस्ट राइड, मानसरोवर यात्रा आदींसाठी मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक नेपाळमध्ये गेले आहेत. राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १००हून अधिक पर्यटक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्तेमार्गे खासगी वाहनाने परतीच्या प्रवासात असून, ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत.
‘जेन झी’च्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये संचारबंदीही लागू झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. काठमांडूमधून पर्यटकांचा एक समूह बुधवारी मुंबईत परतणार होता. मात्र, हे पर्यटक आता गुरुवारी विमानतळावर जातील, असे सांगण्यात आले.
नेपाळमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली, देशाची सुरक्षा लष्कराच्या हाती; संचारबंदी लागू, अनेक शहरांत जवान तैनात
अडकलेल्या पर्यटकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील सर्वाधिक पर्यटक आहेत. या पर्यटकांपैकी ४७ जण काठमांडूतील हॉटेलमध्ये आहेत. उर्वरीत ६५ जण पोखरा येथील हॉटेलमध्ये असल्याचे सांगण्यात आले. ‘या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सरकार तत्पर आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य सरकार नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून, राज्यातील पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटकांना सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Who Is Sushila Karki : नेपाळची धुरा अंतरिम सरकारच्या हाती, सुशीला कार्की करणार नेतृत्व; सरन्यायाधीश ते देशाच्या प्रमुखापर्यंतचा प्रवास कसा?
दरम्यान, अन्नपूर्णा शिखराचे दर्शन, पशुपतिनाथाचे दर्शन, गुप्तेश्वर महादेव गुंफेची सैर, एव्हरेस्ट राइड, मानसरोवर यात्रा… या सर्व धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेट देणे राहिले दूर पण आता मायदेशातल्या आपल्या घरी कसे परतायचे, असा प्रश्न नेपाळमध्ये गेलेल्या भारतीय पर्यटकांना पडला आहे.
Nepal Gen Z Protest : जगात Gen-Z चा पहिला उठाव, नेपाळला मिळणार रॅपर पंतप्रधान
‘जेन झी’च्या आंदोलनामुळे नेपाळमध्ये अराजक माजले आहे. सर्वत्र जाळपोळ, लुटालूट सुरू आहे. त्यातच संचारबंदीही लागू झाली आहे. त्यामुळे काठमांडूतील मुख्य विमानतळही बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी नेपाळमध्ये आलेल्या भारतीय पर्यटकांची कोंडी झाली आहे. घरी कधी जायला मिळेल, याचे ठोस उत्तर देण्यासाठी तिथे कोणतीही यंत्रणा नाही. आंदोलकांकडून पर्यटकांना कोणताही त्रास दिला जात नाही, हीच काय ती समाधानाची बाब.

