• Tue. Mar 10th, 2026

    Pune Crime : घातपाताचा धोका, आयुषच्या अत्यंविधीला पोलिसांचा मोठा फौजफाटा, जेलमधून पित्याला आणल्यानंतर अखेरचा निरोप

    Pune Crime : घातपाताचा धोका, आयुषच्या अत्यंविधीला पोलिसांचा मोठा फौजफाटा, जेलमधून पित्याला आणल्यानंतर अखेरचा निरोप

    पुण्यात आंदेकर-कोमकर कुटुंबातील संघर्षात 20 वर्षीय आयुष कोमकर या तरुणाचा नाहक बळी गेला. आयुषवर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी वैकुंठ स्मशानभूमीत प्रचंड मोठा फौजफाटा तैनात केलेला होता.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात 5 सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता नाना पेठेत टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला होता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्याच्या हेतूने आंदेकर टोळीने त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची हत्या केली. आयुष कोमकर क्लासमधून आपल्या घरी आला होता. यावेळी अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला. आयुषच्या पार्थिवावर आज तीन दिवसांनी अंत्य संस्कार करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता आयुषच्या अंत्यविधीसाठी केवळ त्याच्या वडिलांना हजर राहण्यासाठी परवानगी मिळाली होती.

    वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आयुषचे आई-वडील दोन्ही जेलमध्ये आहेत. आयुषचे वडील गणेश कोमकर याला परवानगी मिळाल्यानंतर त्याला पोलिसांच्या बंदोबस्तात नागपूर कारागृहातून पुण्यात आणण्यात आलं. तसेच पुण्यात गणेश विसर्जनामुळे पोलिसांवर ताण होता. यामुळे आयुषच्या अंत्यविधीला तीन दिवस विलंब झाला. त्यानंतर अखेर आज आयुषच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले.

    स्मशानभूमीत पोलिसांचा मोठा फौजफाटा

    आयुष कोमकर याच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात तैनात करण्यात आला होता. आयुषच्या अंत्यविधीला त्याचे वडील गणेश कोमकर येणार असल्याने आंदेकर गटाकडून घातपात केला जाऊ शकतो, असा अंदाज पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा स्मशानभूमी परिसरात तैनात होता. कोणत्याही प्रकारची घातपाताची घटना घडणार नाही, याची पोलिसांकडून पूर्ण तयारी करण्यात आली.

    आयुषचं पार्थिव आज ससून रुग्णालयातून वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं. पण त्याचे वडील गणेश कोमकर याच्या येण्याची प्रतीक्षा करण्यात आली. गणेश कोमकर याच्यासाठी शेवटचा अंत्यविधी काही काळासाठी थांबवण्यात आला. यावेळी कोमकर कुटुंबीयांसाठी वैकुंठ स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. दोन पोलीस उपायुक्त प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. संवेदनशील परिस्थितीत जमाव नियंत्रण करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले होते.

    आयुषच्या अंत्यविधीवेळी कोमकर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. यावळी अत्यंत दुःखद वातावरण होते. आयुषच्या भावडांनी आणि इतर नातेवाईकांना यावेळी टाहो फोडला होता. आयुषचा भाऊ खूप रडत होता. त्याचा आक्रोश सुन्न करणार होता. या दरम्यान थोड्या वेळाने पेलिसांच्या आणखी काही गाड्या दाखल झाल्या. यापैकी एका पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर बाहेर पडला. त्याच्या आगमनानंतर आयुषच्या पार्थिवावर अंत्य संस्काराचे विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी आयुषचे नातेवाईक आणि वडील गणेश कोमकर यांनी अखेरचा निरोप दिला. अंत्यविधीवेळी पोलिसांनी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्वोतोपरी काळजी घेतलेली बघायला मिळाली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा