Pune Crime: पुण्यात दोन कुटुंबातील टोळीयुद्ध समोर आलं असून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी गायकवाड गटावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती समोर येत आहे.
आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर, गायकवाड गटावर प्रतिहल्ल्याचा कट रचला गेला होता. मात्र, गुन्हा शाखेच्या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे हा कट उधळून लावला गेला होता, अशी माहिती आता समोर येत आहे.
वनराज आंदेकर यांचा खून स्वतःच्या नातवाकडून झाल्याचं समोर आलं होतं. या खुनानंतर आंदेकर टोळीने सोमा गायकवाड याच्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. या हल्ल्यासाठी शस्त्रांची व्यवस्था टिपू पठाण टोळीमार्फत केली जात होती, अशीही माहिती आहे.
Pune Komkar Gangwar: वर्षभरापूर्वीच कट रचला, चौघांनी एकट्याला गोळ्या घातल्या; आयुष कोमकर हत्या प्रकरणाची इनसाईड स्टोरी
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली होती की, टिपू पठाण टोळीचे दोन सदस्य — तालीम खान आणि युनूस हे सोमवार पेठ परिसरात शस्त्रांसह थांबले आहेत. पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पथकाने सापळा रचून त्यांना पकडलं. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती.
तपासात समोर आले की, वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि इतर साथीदारांची घरं आंबेगाव पठार परिसरात आहेत. या घरांची रेकी करून, योग्य संधी पाहून गायकवाड गटावर हल्ला करण्याचा कट आखला गेला होता.
यात दत्ता काळे, कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि टिपू पठाण टोळीतील काही सदस्यांचे नाव समोर आले. काळे याने आरोपींच्या घरांची माहिती गोळा केली; कृष्णा आंदेकरने हल्ल्यासाठी अमन पठाणला बोलावण्याची तयारी केली; यासाठी खोली भाड्याने घेण्यासाठी पैसे दिले गेले; अमन पठाणनेच पुढे “लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा” अशी सूचना दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं.
या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील टोळ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष किती धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे आणखी एक खून, गँगवॉर आणि गुन्हेगारी हिंसा टाळली गेली आहे.

