• Mon. Mar 9th, 2026
    Pune Gang War: लक्ष ठेवा, बाहेर आला की…; वनराज आंदेकरच्या खूनाचा बदला घेण्यासाठी टिपू पठाण टोळीने केलेली मदत?

    Pune Crime: पुण्यात दोन कुटुंबातील टोळीयुद्ध समोर आलं असून वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वी गायकवाड गटावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यासाठी टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    आदित्य भवार, पुणे: पुणे शहरातील दोन कुप्रसिद्ध टोळ्यांमधील राडा पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. पुण्यात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठ परिसरात एक भयंकर घटना घडली. येथे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हत्येतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. 18 वर्षांचा आयुष हा क्लासमधून घरी येत असताना त्याच्यावर चौघांकडून गोळ्या झाडण्यात आला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आंदेकर टोळीतील कृष्णा आंदेकर याच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, आता याप्रकरणात टिपू पठाण टोळीने आंदेकर टोळीला मदत केल्याचंही समोर येत आहे.

    आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर यांचा खून झाल्यानंतर, गायकवाड गटावर प्रतिहल्ल्याचा कट रचला गेला होता. मात्र, गुन्हा शाखेच्या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे हा कट उधळून लावला गेला होता, अशी माहिती आता समोर येत आहे.

    वनराज आंदेकर यांचा खून स्वतःच्या नातवाकडून झाल्याचं समोर आलं होतं. या खुनानंतर आंदेकर टोळीने सोमा गायकवाड याच्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली होती. या हल्ल्यासाठी शस्त्रांची व्यवस्था टिपू पठाण टोळीमार्फत केली जात होती, अशीही माहिती आहे.
    Maharashtra TimesPune Komkar Gangwar: वर्षभरापूर्वीच कट रचला, चौघांनी एकट्याला गोळ्या घातल्या; आयुष कोमकर हत्या प्रकरणाची इनसाईड स्टोरी
    वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली होती की, टिपू पठाण टोळीचे दोन सदस्य — तालीम खान आणि युनूस हे सोमवार पेठ परिसरात शस्त्रांसह थांबले आहेत. पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे आणि पथकाने सापळा रचून त्यांना पकडलं. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती.

    तपासात समोर आले की, वनराज आंदेकर यांच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि इतर साथीदारांची घरं आंबेगाव पठार परिसरात आहेत. या घरांची रेकी करून, योग्य संधी पाहून गायकवाड गटावर हल्ला करण्याचा कट आखला गेला होता.

    यात दत्ता काळे, कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि टिपू पठाण टोळीतील काही सदस्यांचे नाव समोर आले. काळे याने आरोपींच्या घरांची माहिती गोळा केली; कृष्णा आंदेकरने हल्ल्यासाठी अमन पठाणला बोलावण्याची तयारी केली; यासाठी खोली भाड्याने घेण्यासाठी पैसे दिले गेले; अमन पठाणनेच पुढे “लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा” अशी सूचना दिल्याचं पोलिस तपासात उघड झालं.

    या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील टोळ्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष किती धोकादायक पातळीवर पोहोचला आहे, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, पोलिसांच्या सतर्क कारवाईमुळे आणखी एक खून, गँगवॉर आणि गुन्हेगारी हिंसा टाळली गेली आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा