Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरून राज्य सरकारने नवा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. या टीकेनंतर सरकारने ओबीसींसाठी उपसमिती नेमली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे नवी मागणी केली आहे.
“सरकार म्हणजे राज्यातील साडेचौदा कोटी जनतेचे मालक आहेत. तुम्ही ओबीसींसाठी उपसमिती स्थापन केली आहे तर आता आणखी एक काम करा. राज्यातील दलित आणि मुस्लीम समाजासाठीही उपसमिती स्थापन करा. एक उपसमिती शेतकऱ्यांसाठी स्थापन करा आणि मायक्रो ओबीसींसाठी एक वेगळी उपसमिती स्थापन करा,” अशी माहिती मनोज जरांगेंनी केली आहे. तसंच ओबीसींसाठी जी उपसमिती स्थापन करण्यात आली तिचा मायक्रो ओबीसींना काहीच फायदा होणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत करण्यात आली असेल तर आमची काही नाराजी नाही, विरोध नाही. गोरगरीब ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी हे करण्यात आले असेल तर आमची काही हरकत नाही. पण मी माझ्या समाजास आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे. कितीही उपसमित्या स्थापन केल्या, माझ्या अंगावर सोडल्या, राजकारणी लोकांचं ऐकून आमच्यावर टीका केली तरी मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देतोय, याची समाजाला खात्री आहे. मराठ्यांना ओबीसीत मीच घालणार आणि मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मीच देणार. त्यामुळे कोणीही काहीही बोललं तरी फरक पडणार नाही.”
Nilesh Rane : कोकणातील सहा नेत्यांचं भाजपातून निलंबन, निलेश राणे खवळले, म्हणाले राणे साहेब ज्या दिवशी…
छगन भुजबळांवर हल्लाबोल
ओबीसी उपसमितीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. “छगन भुजबळ म्हणजे ज्या पक्षात जाईल त्या पक्षाचंच अस्तित्व आणि कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस आहे. त्यामुळे ओबीसी उपसमितीचं अध्यक्षपद चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं असावं. पण तो माझा प्रश्न नाही. माझा विषय आहे आरक्षण आणि मी त्यासाठी तुटून पडलोय. कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही आणि मी पण कोणावर विश्वास ठेवत नाही. कारण माझ्या समाजालाही माहीत आहे की, जे लोक आता बोलत आहेत, जे जीआरबद्दल संभ्रम निर्माण करत आहेत ते आधी कुठे झोपले होते? बैठकांना बोलवल्यावर का येत नाहीत? मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत. हे लोक कुठेच नसतात, फक्त टीव्हीवर असतात. या अभ्यासकांना बोलवायचंच नव्हतं, पण मुंबईतील काही लोक म्हणाले की सगळ्यांना विश्वासात घेऊ. त्यामुळे आम्ही त्यांना बोलावलं होतं. परंतु हेच अभ्यासक आता कुरापती करत आहेत आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं ते म्हणाले.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासाठी उपयुक्त असणार्या सातारा गॅझेटची अंमलबजावणी पुढील काही दिवसांत झाली नाही तर मी नेत्यांना पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करेन, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

