• Sat. Jun 6th, 2026

    Manoj Jarange : ‘मी जरांगेंना फोन करून रडून सांगितलं होतं, तू हे…’; माजी न्यायमूर्तींनी सांगितलं मराठ्यांची फसवणूक कशी झाली?

    Manoj Jarange : ‘मी जरांगेंना फोन करून रडून सांगितलं होतं, तू हे…’; माजी न्यायमूर्तींनी सांगितलं मराठ्यांची फसवणूक कशी झाली?

    B. G. Kolse Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षण यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळला, मात्र आता यावरून अनेक अभ्यासकांनी आपलं मत व्यक्त करताना फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे. माजी न्यायमूर्तींनी शंका उपस्थित करत खळबळ उडवली आहे. नेमके काय म्हणाले जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजीत दराडे, पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. सरकारकडून हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा जीआर निघाल्यानंतरच जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतले. ‘राजे हो आपण जिंकलो’ अशी आरोळी ठोकत आंदोलनकर्त्यांनीही गुलाल उधळला. मात्र या जीआर वरच माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे पाटील यांनी शंका उपस्थित करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

    आजचा जीआर म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पुसलेली पान आहेत, असं मतं माजी न्यायमूर्ती बी.जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. मी १००% खरं बोलून टिकेचा धनी व्हायला तयार आहे. डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणं म्हणजे काय हे मला आता समजलं. इतक्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं? मी जरांगे पाटलांना फोन करून रडून सांगितलं होतं तुम्ही हे बरोबर करत नाहीत, यामध्ये तुझ्याही तब्येतीचं नुकसान होईल आणि मराठ्यांचा देखील अतोनात नुकसान होणार आहे. आज जे सरकारने तुम्हाला कबूल केला आहे ते कायद्याच्या कोणत्याच कसोटीमध्ये बसणार नाही. हा जीआर पाहून मी हतबल झालो. असं बी जी कोळसे पाटील म्हणाले आहेत.
    Maharashtra TimesMaratha Reservation : ‘मी मनोजदादांच्या माणसांना मेसेज करेपर्यंत सगळं गुंडाळलं होतं’, असीम सरोदे यांनी सांगितलं काल नेमकं काय घडलं
    फक्त बी.जी कोळसे पाटीलच नाही तर मराठा राज्य समन्वयक योगेश केदार आणि ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी देखील अशाच पद्धतीचा संशय या सरकारच्या जीआर वर व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा युद्धात जिंकलो मात्र तहात हरलो अशी भावना निर्माण व्हायला लागली आहे.
    Maharashtra TimesMaratha Reservation GR: जरांगे पाटलांचा विजयी गुलाल, छगन भुजबळांनी सुरू केल्या हालचाली; पडद्याआड काय घडतंय?
    काल ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी जल्लोष साजरा केला त्याच पद्धतीचा जल्लोष नवी मुंबई या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर केला होता. मात्र, त्यानंतर मराठा समाजाची घोर निराशा झाली होती आणि आरक्षण आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करावा लागला होता. आता देखील सरकारने पूर्ण केलेल्या मागण्या आणि दिलेल्या आश्वासना संदर्भात सुद्धा मराठा समाजामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा