• Tue. Jun 16th, 2026

    Nagpur News: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मूकबधिर मुलाचा मृत्यू, बॉडी कुशित घेत आई तशीच बसून; पाहून सारे सुन्न

    Nagpur News: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मूकबधिर मुलाचा मृत्यू, बॉडी कुशित घेत आई तशीच बसून; पाहून सारे सुन्न

    Nagpur Boy Drown To Death: नागपुरातील काटोल येथे नगरपरिषदेच्या डम्पिंग साइटवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून एका मुकबधिर मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर: काटोल तालुक्यातील खानगाव पारधी बेड्यावर मंगळवारी सकाळी घडलेली घटना परिसराला हादरवून गेली. नगरपरिषदेच्या डम्पिंग साइटवरील पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मूकबधिर मुलाचा विराट राणा पवार याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिकांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

    काटोल नगरपरिषदेने कचरा डम्पिंगसाठी मोठमोठे खड्डे खोदले होते. मात्र, त्यांची सुरक्षितता किंवा योग्य देखरेख केली नव्हती. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि परिसर धोकादायक बनला. याच खड्ड्यात पडून विराटचा जीव गेला. अपंगत्वामुळे आधीच संघर्षमय जीवन जगणाऱ्या या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाचे दुःख पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. आई माधुरी पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण समाजानेही या दुर्घटनेबद्दल तीव्र संपात व्यक्त केला आहे.
    Maharashtra TimesNagpur News: ओव्हरटेक करताना दुपट्टा ट्रकच्या चाकात अडकला अन् तरुणीचा भयंकर अंत, नागपुरात दोघांनी जीव गमावला
    याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “गेल्या अनेक वर्षांपासून या खड्ड्यांना बुजवण्याची मागणी केली जात आहे. आमदार, मंत्री आणि प्रशासनाकडे वारंवार निवेदन दिले, पण फक्त आश्वासने मिळाली. अखेर या निष्काळजीपणामुळे एका निरागस जीवाचा बळी गेला.” शुभांगी राजपूत, तरामती रेवतकर, हरिचंद्र राजपूत यांच्यासह नागरिकांनी नगरपरिषद आणि डम्पिंग कंपनीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकणााचा प्राथमिक तपास सुरू असला तरी पारधी समाजाचा आग्रह आहे की, “ही केवळ चौकशीपुरती मर्यादित राहू नये. दोषींना शिक्षा झाली पाहिजे आणि धोकादायक खड्डे तात्काळ बुजवले गेले पाहिजेत.”

    दरम्यान, नगरपरिषद आणि संबंधित कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, या घटनेने स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विराटचा मृत्यू हा फक्त अपघात नसून, व्यवस्थेच्या त्रुटींचे ठळक उदाहरण ठरला आहे, असं म्हणत परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा