Bhandara News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत भंडाऱ्याच्या पालकमंत्र्यांची उलचबांगडी केली आहे. विद्यमान पालकमंत्री संजय सावकारे हे केवळ विशिष्ट कार्यक्रमांनाच उपस्थित राहत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर पालकमंत्री बदलाची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यात नियमित येत नसल्याचा आक्षेप होता. ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, तसंच जिल्हा नियोजन बैठकांसाठीच हजर राहायचे. यामुळे नागरिकांच्या समस्या प्रलंबित होत्या आणि भंडारा जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारीही नाराजी होते. या पार्श्वभूमीवर भंडाऱ्याला स्थानिक पालकमंत्री हवा, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे अखेर सरकारने संजय सावकारे यांना हटवून भोयर यांना संधी दिली. पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्याचे असल्याने जवळच असलेल्या भंडाऱ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पंकज भोयर काय म्हणाले?
“संजय सावकारे यांचंही काम चांगलं होतं. परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना हा जिल्हा दूर पडत असावा आणि मी विदर्भातीलच असल्यामुळे माझ्यावर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असावी. महायुतीच्या सरकारमध्ये तीन घटकपक्ष आहेत. या तीनही पक्षातील नेत्यांशी समन्वय ठेवून मी काम करणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शेकडो योजनांची अंमलबजावणी आपण वर्धा जिल्ह्यात केली आहे. त्याच योजनांची अंमलबजावणी आता आपण भंडारा जिल्ह्यात करू. मला ही संधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर पंकज भोयर यांनी दिली आहे.

