• Mon. Mar 16th, 2026
    Nagpur Crime : ‘माझ्या मुलांना घराबाहेर काढलं तर मी…’; पोटच्या दोन मुलांना तीन वर्ष कोंडून ठेवलं, असं फुटलं बिंग

    Nagpur Two Boys Kept Locked up for Three Years : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातल्या त्यात नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे चक्क एका आईने आपल्या पोटच्या दोन मुलांना तीन वर्ष कोंडून ठेवलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

    नागपूर क्राइम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नागपूर : ‘माझ्या मुलांना घराबाहेर काढले तर मी स्वत: आणि मुलांनाही मारून टाकेल’, अशी धमकी आपल्या पतीला देत एका आईनेच आपल्या दोन मुलांना चक्क तीन वर्षे घरातच कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या मुलांना शाळेतही पाठविले नाही. सहा आणि सात वर्षे वय होऊनही या मुलांना बोलताही येत नाही. अखेर जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या चमूने पोलिसांच्या मदतीने या मुलांची सुटका केली. दोन्ही मुलांना शासकीय बालगृहात पाठविण्यात आले असून आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    दाभा भागातील हे कुटुंब. या कुटुंबात पती (वय ३५ वर्षे), पत्नी (वय ३३ वर्षे) आणि दोन मुले असे चार सदस्य आहेत. एका मुलगा आता साडेसहा वर्षांचा झाला असून दुसरा साडेसात वर्षांचा आहे. या कुटुंबातील महिला मानसिक रुग्ण असून नातेवाईकांसोबतही वाद घालायची. त्यामुळे त्यांच्याकडे नातेवाईकही येत नाहीत. या महिलेचे पती मजुरीचे काम करतात. पत्नीकडून वारंवार मुलांना आणि स्वत:ला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने पतीने या विरोधात कधी तक्रारच केली नाही. पती अनेकदा घरीही जात नव्हता, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

    Maharashtra TimesMumbai Boat Accident: मुंबईत पुन्हा नेव्हीच्या बोटीची प्रवाशी बोटीला धडक, थरारक घटनेने प्रवाशांमध्ये घबराट, पण…
    मुलांचे बालपण सुरक्षित राहावे यासाठी शासनाच्यावतीने ग्राम बालसंरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट या संस्थेच्या मदतीने नुकतीच दाभा परिसरात एक बैठक घेण्यात आली. ट्रस्टच्या प्रतिनिधी अश्विनी चौरे यांना इतर सदस्यांनी दाभा परिसरातील या कुटुंबाची माहिती दिली. चौरे यांनी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना कळविले. चाइल्ड हेल्पलाइनवर माहिती देऊन प्रकरण नोंदविण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेश्रे यांनाही कळविण्यात आले. मेश्रे यांनी तातडीने पथक नेमून मुलांची सुटका करण्याचे आदेश दिले. या कारवाईत चाइल्ड लाइन प्रतिनिधी मीनाक्षी धडाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या समन्वयक शायना शेख, अश्विनी चौरे, सामाजिक कार्यकर्ता वर्षा पाटील, न्यू व्हिजन फाऊंडेशन अध्यक्षा प्रियंका होटे यांच्यासह वाडी पोलिस सहभागी झाले होते.

    दोन्ही मुले मानसिक धक्क्यात

    बाल संरक्षण पथक पोलिसांना घेऊन दाभा परिसरात पोहोचले. त्यांच्यासोबत त्या महिलेचा पतीही होता. आवाज देऊनही खूप वेळ दरवाजा उघडला जात नव्हता. पोलिसांनी धाक दाखविल्याने अखेर दरवाजा उघडण्यात आला. मुले मोठ्या मानसिक धक्क्यात असल्याचे आढळून आले. पथकातील सदस्यांकडे ते टक टक बघत होते. त्यांचे वागणेही विचित्र होते. कुठल्यातरी वेगळ्या जगातून आल्यासारखे त्यांचे वागणे होते. या दोन्ही मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने मुलांची वैद्यकीय तपासणी करून मानसोपचार तज्ज्ञांना दाखविण्याचे आदेश दिले. पुढील तपास सुरू असून मुलांच्या नातेवाईकांचीही गृहतपासणी करण्यात येणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.

    Maharashtra TimesEknath Shinde : ‘वोट चोरीचा आरोप करणाऱ्यांकडून साखर चोरी’; एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब थोरातांवर टीका

    तर पालकांवरही गुन्हा

    ‘अंडर कस्टडी क्रुएल्टी’ कायद्याच्या कलम ७५ अंतर्गत मुलांवर पालक, नातेवाईक, शिक्षक यांच्याकडूनही अत्याचार होत असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होतो. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आले तर नागरिकांनी १०९८ या चाइल्ड हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुस्ताक पठाण यांनी केले. बालन्याय अधिनियमांतर्गत या मुलांना पूर्ण सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा