Wadala Mother-Son Death : मुसळधार पावसाने मुंबईत हाहा:कार माजला असून त्यातच दुखद बातमी घडली आहे. बेस्ट बसखाली चिरडल्याने मायलेकाचा मृत्यू झाला.
मुंबईत पावसाचा जोर वाढत असल्याने दुपारनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. वडाळा येथे वास्तव्यास असलेली इलोजियस ही मुलांना आणण्यासाठी परिसरातच असलेल्या सेंट जोसेफ शाळेत पोहोचली. तीन मुलांना घेऊन परतत असताना दुपारी ३च्या सुमारास १७४ क्रमांकाच्या बेस्ट बसने तिला धडक दिली. भरधाव बस येत असल्याचे पाहून तिने दोन मुलांना बाजूला सारले, मात्र ती आणि अँटोनी दोघे बसखाली चिरडले.
गंभीर जखमी झालेल्या इलोजियस हिला सायन रुग्णालयात, तर अँटोनी याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालक बाबू नागपेन्ने (४०) याला अटक केली. निष्काळजीमुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बाबू याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Rain: राज्यात पावसाचे सात बळी! मुंबईत दाणादाण, मराठवाड्यात 11 जण बेपत्ता, NDRF तैनात
मिठी नदीत एकजण वाहून गेला
मुंबई : वांद्रे येथील वाल्मिकी नगर परिसरात मिठी नदीच्या पात्रात एकजण वाहून गेला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वरदान जंजोतर (२४) असे या तरुणाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.
झाड पडून एकाचा मृत्यू
नेपीयन्सी रोड येथील शिमला हाऊस गोदरेज बाग येथे एका संरक्षक भिंतीचा भाग झाडावर कोसळला. त्यामुळे झाड तेथून जाणाऱ्या सतीश तरके या ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीवर पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. सहार रोड पारसी वाडी येथे झाड पडून ४० वर्षीय जयंत गोसावी हे जखमी झाले. त्यांच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत दिवसभरात १२ झाडे पडण्याच्या घटना घडल्या, तीन ठिकाणी घरे आणि नऊ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.
Maharashra Weather Update: मुंबईला ‘रेड अलर्ट’! ठाणे, पालघर, रायगडमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता
‘बेस्ट’ मार्गात बदल
मुंबईतील १५ ठिकाणी पाणी साचल्याने ‘बेस्ट’ला अन्य मार्गाने वाहतूक वळवावी लागली. पाण्यातून वाट काढताना काही ठिकाणी बेस्ट बसही बंद पडत होत्या. शेल कॉलनी, गांधी मार्केट, संगमनगर, आरसीएफ रेल्वे ब्रिजसमोर, मडकेबुआ चौक, हिंदमाता, टिळक रोड यासह अनेक मार्गावरील ‘बेस्ट’ वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. महापालिकेने मात्र बारा ठिकाणी पाणी साचल्याची माहिती दिली

