Pune Crime CCTV Footage : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं आपण पाहिलं असेल. स्वातंत्र्यदिनावदिवशी चोर करण्याचा प्रयत्न फसला. तिघे तोंडाला मास्क लावून आत शिरले आणि सोनारावर हल्ला चढवला. पण एकटा सोनार त्या तिघांना पुरून उरला. सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
नेमाराम चौधरी (वय ५८) यांचे औंध येथील ओंकार कॉम्प्लेक्समध्ये रामदेव ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान आहे. स्वातंत्र्य दिन असल्यामुळे रस्त्यांवर रहदारी कमी आणि दुकानात गर्दी सुद्धा नव्हती. त्यामुळे नेमाराम चौधरी हे दुकानात सुमारे साडेतीनच्या दरम्यान एकटेच बसलेले होते. इतक्यात तीन जण दुकानात शिरले. त्यांच्या हातात कोयते होते, तलवारी होत्या. हातातील हत्यार पाहून नेमाराम चौधरी यांना क्षणात कळलंय की चोरटे आपल्या दुकानात घुसले. नेमाराम चौधरी यांना काही कळण्याच्या आतच या तीनही चोरट्याने त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. चोरट्यांनी हल्ला चढवताच तितक्याच ताकतीने चौधरी यांनी त्यांचा प्रतिकार केला.
सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी, एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या 10 KM पर्यंत रांगा
नेमाराम चौधरी यांचा प्रतिकार पाहून तीन चोरट्यांनी त्यांना खेचत दुकानाच्या बाहेर आणले. दुकानाच्या बाहेर आणून चोरट्या पैकी एकाने त्यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चौधरी यांनी आरडाओरड करताच आजूबाजूचे लोक जमा व्हायला लागले आणि हे पाहताच चोरट्यांनी तिथून धूम ठोकली. चोरटे पळून जात असले तरी चौधरी यांनी माघार घेतली नाही, चौधरींनी चोरट्यांचा पाठलाग केला. दुकानाच्या बाजूला लावलेल्या आपल्या दुचाकी वर बसण्याचा प्रयत्न चोरटे करत असतानाच नेमाराम चौधरी यांनी दुचाकी वर एक लाख मारून ती जागेवरच खाली पडली. त्यामुळे चोरटे दुचाकी सोडून विधाते वस्तीकडे जाणार्या रस्त्याने पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.
याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भोजनावळे यांनी अधिक माहिती दिली आहे. चोरटे दुकानात केवळ ४० सेंकद होते. त्यानंतर त्यांनी चौधरी यांना मारहाण करत बाहेर आणले. चोरट्यांना दुकानातून काही चोरुन नेता आले नाही. पण चोरट्यांचा नेमका चोरीचा प्रयत्न होता की आणखी काय कारण होते, याची तपासणी करीत आहोत. पण दिवसाढवळ्या तेही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पुण्यात अशा पद्धतीने हातात कोयते घेऊन चोरीचा प्रयत्न झाल्याने पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

