• Tue. Jun 16th, 2026
    ‘लाडकी बहीण’ योजना अजित पवारांची! महायुतीला यामुळेच २३८ जागा; सुनील तटकरेंचा दावा

    Sunil Tatkare On Ladki Bahin Yojana: मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यात आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

    ajit pawar news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ योजना आणल्यानेच राज्यात महायुतीला २३८ जागा मिळाल्या,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला. तटकरे यांच्या या वक्तव्यावरून महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

    लाडकी बहीण योजना फसवी असल्याचे विरोधक सांगतात. महिलांचा स्वाभिमान दीड हजार रुपयांत विकत घेण्यात आला, असा आरोपही करण्यात आला; पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला ही योजना काय समजणार,’ असा टोलाही तटकरे यांनी लगावला. तटकरे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला यश मिळाल्याचे अधोरेखित करत योजनेचे सर्व श्रेय उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना दिले. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील’, असेही त्यांनी नमूद केले.
    Maharashtra TimesMumbai Crime: बचत खात्यापेक्षा चालू खात्याला ‘भाव’; सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती पुरवणारी टोळी कांदिवलीतून अटकेत
    देशात सध्या गाजत असलेल्या मतदारयाद्यांच्या विषयांवर तटकरे यांनी मत मांडले. ‘मतदारयाद्यांमध्ये काहीही घोळ नाही. यादींवर सूचना हरकती मांडण्यास वेळ मिळतो. राजकीय पक्षांना त्यासाठी पुरेसा वेळही दिला. परंतु, गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून पुन्हा एक नवे ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. मतदानादिवशी हे प्रतिनिधी काहीच आक्षेप नोंदवत नाहीत. परंतु, महिन्यांनंतर आक्षेप घेतला जातो, हे दुसरेतिसरे काही नसून राजकारण आहे’, असे तटकरे म्हणाले.
    Maharashtra TimesMumbai Kabutar Khana: कबुतरखान्यांच्या तिढ्यावर 12 तज्ज्ञांची समिती; आरोग्यावरील परिणामांचा अभ्यास करणार
    ‘मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या’

    ‘विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते न पाहता आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्या’, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुनेत्रा पवार यांनी महिलांना केले. ‘सरकारच्या माध्यमातून आपले नेते करत असलेले काम नागरिकांपर्यंत पोहोचवायचे आहे. हे सोशल मीडियाचे युग आहे. त्या माध्यमातून आपल्या कामाची प्रभावीपणे मांडणी करण्याची गरज आहे. आपण जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर असतो. त्यामुळे त्याचा उपयोग करून पक्षाचे चांगले काम या सोशल मीडियावर मांडायला शिका,’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा