• Thu. Jun 11th, 2026

    मनसे अध्यक्षांनी मुंबईतील ‘ठाकरे’ ब्रॅण्डची ताकद सांगितली; पलटवार करताना फडणवीसांनी गणितच मांडलं

    मनसे अध्यक्षांनी मुंबईतील ‘ठाकरे’ ब्रॅण्डची ताकद सांगितली; पलटवार करताना फडणवीसांनी गणितच मांडलं

    Devendra Fadnavis: राज ठाकरे यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 पासून मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याचं सांगत फडणवीस यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे.

    मनसे अध्यक्षांनी मुंबईतील ‘ठाकरे’ ब्रॅण्डची ताकद सांगितली; पलटवार करताना फडणवीसांनी गणितच मांडलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंचे मनोमिलन झाल्यानंतर आता या दोघांच्या नेतृत्वाखालील राजकीय पक्षही एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे या पक्षांची युती होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं. मुंबईत फक्त मनसे आणि शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज यांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

    राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “2014, 2019 आणि 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजप सर्वांत मोठा पक्ष होता. मात्र आपला पक्ष मोठा आहे, असं म्हणायचा सगळ्यांना अधिकार आहे,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज यांना लगावला आहे.

    Maharashtra Timesमहायुतीत सारं काही आलबेल नाही, हिंगोलीत मोठी धुसफूस, शिवसेना आमदाराचा भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप

    मतदार याद्यांबाबतच्या गोंधळावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादी घोळाचा आरोप करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपला लक्ष्य केल्यानंतर देशभरात सध्या हा मुद्दा चर्चेत आहे. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. मतदार याद्यांमधील चुका सुधारण्यासाठी पुनरीक्षण गरजेचं आहे, असं देवेंद्र यांनी स्पष्ट केलं. गेल्या २५ वर्षात याद्यांमध्ये सुधारणा न झाल्याने दोष निर्माण झाले आहेत. पुनरीक्षण झाले, तरच याद्या योग्य होतील, असं ते म्हणाले.

    दरम्यान, “मतदारयाद्यांमधील चुका सुधारण्यासाठी मी 2012 मध्ये या दोषांविरोधात उच्च न्यायालयात गेलो होतो. आजही ती याचिका प्रलंबित आहे. या चुका सुधारण्यासाठी मतदारयाद्यांचे पुनरीक्षण करणे आवश्यक आहे. व्यापक पुनरीक्षण हाच यावरील उपाय आहे. निवडणूक आयोगाने आता हे काम सुरु केले आहे, पण काही लोक त्याला विरोध करत आहेत, हे चुकीचे आहे,” अशी भूमिकाही मुख्यमंत्र्‍यांनी मांडली आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा