Nagpur Rain : नागपुरात आठवडाभरानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तुंबलेल्या पावसाळी वाहिन्यांमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. आता तरी चित्र बदलेल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाने ब्रेक घेतला. त्यामुळे आकाश ढग असले तरी पाऊस होत नसल्याने उकाड्यातही चांगलीच वाढ झाली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी आकाशात काळे ढग दाटून आले आणि शहरात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला तरी रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेले होते. यातून मार्ग काढताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. यावरून महापालिकेकडून पावसानंतर रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना फारशा गांभीर्याने करण्यात आलेल्या नाहीत हे पुन्हा समोर आले.
दुपारी झालेल्या काही तासांच्या पावसानंतर घाट रोडवरील सरदार पटेल चौक, अमरावती मार्गावरील भरतनगर, रविनगरचा भाग, शंकरनगर नरेंद्रनगर, मनीषनगर, पडोळे चौक, बजाजनगर चौकाचा काही भागासह अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. इतकेच नव्हे तर रामदासपेठसह अनेक प्रमुख वस्त्यांमधील आतल्या रस्तेही पाण्याने तुंबलेले होते. जुलै अखेरीस झालेल्या पावसानंतर शहराचे अनेक भाग पाण्याखाली होते. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना बचाव करून सुखरुप बाहेर काढण्यात आले होते.
पावसानंतर महापालिकेच्या कामाची पोलखोल झाल्यानंतर शहराचे खासदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेला पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. यात तुंबलेल्या पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता करणे, पाणी साचणाऱ्या रस्त्यांवर ते निघून जाण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आदी सूचना दिल्या होत्या. मात्र, यानंतरही याचे फारसे गांभीर्याने पालन झालेले नाही असे दिसून आले. अनेक पावसाळी वाहिन्यांमधील तुंबलेला कचरा, बांधकाम साहित्याचा पाण्याने जमा झालेला मलबा न काढल्याने पाणी निघून जायला मार्ग न मिळाल्याने रस्ते तुंबले. काही ठिकाणी पाणी निघून जाण्यासाठी नागरिकांकडून वाहिन्यांमधील कचरा काढून पाण्याला मार्ग मोकळा करून देण्यात येत होता.

