• Sun. Mar 8th, 2026

    Dadar Kabutar Khana: कबुतरखानाबंदी कायम! हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिका फेटाळली

    Dadar Kabutar Khana: कबुतरखानाबंदी कायम! हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिका फेटाळली

    Dadar Kabutar Khana: मुंबई महापालिकेने दादर कबुतरखाना सोमवारी पुन्हा ताडपत्रीने बंदिस्त केला. कबुतरांना खाद्य टाकू नये, यासाठी महापालिकेने कारवाईसाठी कर्मचारीही तैनात केले असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

    kabutar khana dadar (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मानवी आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने मुंबईतील कबुतरखान्यांवर मुंबई महापालिकेने घातलेली आणि मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलेली बंदी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानेही कायम राहिली. बंदीचा आदेश मोडून कबुतरखान्यांच्या ठिकाणी कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा आणि बंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, या उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळले.

    ‘मुंबईत किमान एक दशकापासून कबुतरांना दाणे टाकण्यासाठी ५१ निश्चित ठिकाणे आहेत. ती कोणतेही ठोस कारण न देता मुंबई महापालिकेने अचानक बंद केली. याविरोधात आम्ही दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने आमचे म्हणणे सविस्तर ऐकून न घेताच अनावश्यक घाई करत अंतरिम आदेश दिले’, असा दावा करत मूळ याचिकाकर्त्या पल्लवी पाटील व अन्य काहींनी अपील केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देऊन अपील फेटाळले. ‘हे अपील अंतरिम आदेशाविरोधातील आहे. याप्रश्नी उच्च न्यायालयात अद्याप गुणवत्तेवर सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत समांतर सुनावणी घेऊन हस्तक्षेप करणे उचित होणार नाही. त्यामुळे अपिलावरील सुनावणीस आम्ही इच्छुक नसल्याने ते फेटाळण्यात येत आहे. परंतु, अपिलकर्त्यांना उच्च न्यायालयात अंतरिम आदेशातील बदलासाठी अर्ज करता येऊ शकेल’, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.
    Udhhav Thackeray Slams Mahayuti : ‘पैसे गिळणाऱ्यांचं यांचं तोंड,’ भ्रष्टाचारावरुन उद्धव ठाकरेंचा सरकारवर तिखट वार, मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार
    ‘माणसांच्या श्वसनविकारांसाठी कबुतरांच्या विष्ठा व पिसे ही कारणे जबाबदार नसून मुंबईतील वायू प्रदूषणाची अन्य कारणे आहेत’, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी अपिलात मांडला होता. अपिलकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी न्या. जे. के. महेश्वरी व न्या. विजय बिश्नोई यांच्या खंडपीठासमोर अपिलाची पार्श्वभूमीवर सांगितली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने कबुतरखान्यांवरील बंदी कायम राहणार आहे.
    Sanjay Raut : ‘देवेंद्र फडणवीसांनी गप्प राहिलं पाहिजे, त्यांच्याकडे चोरीचा माल’, संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
    कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असल्याचे आणि विधिमंडळातही प्रश्न उपस्थित होत असल्याचे लक्षात घेऊन राज्य सरकारतर्फे ३ जुलै रोजी बंदीची घोषणा करण्यात आली होती. मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला तत्काळ देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने बंदी लागू केली. त्याविरोधात पल्लवी पाटील व अन्य काहींनी याचिका केल्या आहेत. बंदी उठवण्याची त्यांची विनंती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दोनदा फेटाळली. दरम्यान, महापालिका व मुंबई पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. कबुतरांना दाणे टाकल्याप्रकरणी याआधी शिवाजी पार्क व माहीममध्ये आणि सोमवारी गिरगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला.

    उपोषणाचा इशारा, ‘चलो दादर’ची हाक
    मुंबई :
    दादरचा कबुतरखाना इशारा ताडपत्रीने पुन्हा बंदिस्त करण्याच्या निर्णयाविरोधात जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी १३ ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा दिला आहे. तर, न्यायालयाच्या निर्णयाचे पालन होत नसल्याने आणि या माध्यमातून समाजाची ताकद वापरून दबावतंत्राचा वापर सुरू असल्याचा निषेध करत मराठी एकीकरण समितीनेही १३ ऑगस्टला ‘चलो दादर’ असा इशारा दिला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा