• Mon. Mar 9th, 2026
    बोगस मतदारांवरून अहिल्यानगरात राजकारण तापलं, थोरातांचं शिर्डीकडे बोट, विखेंचंही प्रत्युत्तर

    राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वीच बोगस मतदार नोंदणीसंबंधी पत्रकार परिषद घेतली आणि निवडणूक आयोगावर आरोप केले होते. यावरूनच अहिल्यानगरातील राजकारण तापलं आहे. बाळासाहेब थोरातांनी शिर्डीकडे बोट दाखवले असून विखेंनीही त्यावर प्रत्युत्तर दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    विजयसिंह होलम, अहिल्यानगर: लोकसभेचेविरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी बोगस मतदार नोंदणीसंबंधी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत. त्यावरून सर्वत्र आरोपप्रात्यारोप सुरू आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातही यावरून वाकयुद्ध रंगले. राहुल गांधी यांच्या आरोपांचा संदर्भ देत थोरात म्हणाले की, शिर्डी विधानसभा मतदारसंघातही अशीच बोगस मतदार नोंदणी झाली आहे. तर याला उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील यांनी कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेसचे सरकार बोगस मतदारांमुळे आले का? असा सवाल केला आहे.

    बाळासाहेब थोरातांचे आरोप

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना थोरात म्हणाले, राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने दिली पाहिजेत. मात्र चोरी पकडली गेल्याने भाजपचे लोक अस्वसथ झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मूळ विषयाला बगल देऊन उलट सुलट बोलणे मुख्यमंत्री पदाला शोभत नाही. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने निरनिराळे फंडे वापरले. निवडणूक आयोगाने डिजिटल सॉफ्ट कॉपी दिली असती तर अनेक मतदारसंघाची तपासणी करता आली असती. शिर्डी विधानसभा मतदारसंघात असाच मतदार नोंदणी घोटाळा झाला आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही. आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही, असा आरोप थोरात यांनी केला.

    विखेंचं प्रत्युत्तर
    थोरात यांच्या या आरोपांना इत्तर देताना विखे पाटील म्हणाले, राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते आपले अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करत आहेत. बेताल वक्तव्याने जनतेचे मनोरंजन होईल मात्र राहुल गांधींना कुणीही गांभीर्याने घेत नाही. तेलंगणात त्यांचे सरकार आल्यावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला का? कर्नाटकचे काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आले का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने मिळाल्या का? लोकांना यांचा खरा चेहरा समजल्याने त्यांना विधानसभेला यश मिळाले नाही. अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले, याला तुम्ही बोगस मतदान म्हणणार असाल तर हा मतदारांचा अपमान आहे. बोगस मतदानाबाबत शपथपत्र केले तर आरोप सिद्ध करावे लागतील. नाही करता आले तर राहुल गांधींवर गुन्हा दाखल होऊन सदस्यत्व रद्द होऊ शकते, त्यामुळे योग्य त्या मार्गाने तक्रार करण्यापेक्षा केवळ आरोप केले जात आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा