Palghar News : कावड यात्रेनिमित्त वसईच्या तुंगारेश्वर येथे गेलेल्या मित्रांच्या समुहामधील दोन जणांना जलसमाधी मिळाली. 18 वर्षांच्या दोन्ही तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पाण्यात उतरण्याचा मोह जीवावर बेतला
श्रावणी सोमवार निमित्त नालासोपारा येथून विरार पूर्वेकडील मांडवी परिसरातील तुंगारेश्वर, येथे कावड यात्रा निघाली होती. या कावड यात्रेत नालासोपारा पूर्व श्रीराम नगर परिसरातील रहिवासी असलेले सचिन यादव, हिमांशू विश्वकर्मा आणि त्यांचे मित्र असा सहा जणांचा एक ग्रुप सहभागी झाला होता. तुंगारेश्वर येथे पोहोचल्यानंतर देवाचे दर्शन घेऊन जेवण करून परतीचा प्रवास करू लागले असताना तुंगारेश्वर येथे नदीच्या पाण्यात उतरण्याचा मोह या तरुणांना आवरता आला नाही.
Maharashtra Weather Update : मराठवाड्यात पावसाची पुन्हा दडी, पिके कोमेजली; शेतकरी चिंतेत, पुढील १० दिवसांत कसा असेल पाऊस? IMD ची माहिती
एकाचा धक्का दुसऱ्याला लागला
या तरुणांपैकी एक तरुण पाण्यात जात असताना त्याचा पाय घसरला आणि त्याचा धक्का दुसऱ्या तरुणाला लागल्याने दोघेही नदीच्या पाण्यात पडले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. नदीत पडलेल्या दोघांना वाचवण्यासाठी एक मित्र प्रयत्न करू लागला, मात्र तोही बुडू लागला. सुदैवाने इतर तरुणांनी त्याला कसेबसे पाण्याबाहेर काढले.
Mahesh Patil : राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला संपवलं, तिघे दोषी, शिवसेना माजी नगरसेवकाची निर्दोष सुटका
सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्य हाती घेण्यात आले. त्यानंतर बचाव पथकाने पाण्यात बुडालेल्या दोन्ही तरुणांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कावड यात्रेसाठी गेलेल्या सचिन यादव, हिमांशू विश्वकर्मा या दोन तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाण्याच्या ठिकाणी जाणं जीवावर बेतू शकतं. त्यामुळे कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाताना तरुणांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

