• Sun. Mar 8th, 2026
    नेहरू-गांधींच्या विचारांचा संदर्भ देत गडकरींनी मांडला विदर्भ विकासाचा दृष्टिकोन, नेमकं काय म्हणाले? वाचा

    Nitin Gadkari on Jawarharlal Nehru and Gandhi : नितीन गडकरी यांनी जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या दृष्टीकोनाचा संदर्भ देत एक संतुलित भाष्य केले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    जितेंद्र खापरे, नागपूर : भाजप नेत्यांकडून अनेकदा पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या धोरणांवर कठोर टीका होत असते. यात मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोन्ही नेत्यांच्या विकासविषयक दृष्टिकोनाचा सकारात्मक संदर्भ देत नागपूरमध्ये एक संतुलित भूमिका मांडली आहे. रविवारी नागपूरमध्ये कन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) च्या विदर्भ विभागीय कार्यालयाचे उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंडित नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारांची तुलना करत विदर्भ विकासासाठी प्रेरणादायी दिशानिर्देश दिले.

    गडकरी म्हणाले, ‘गांधीजी आणि नेहरूजी यांचे दोन विचार फार प्रसिद्ध आहेत. नेहरू म्हणायचे ‘आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हवे’ तर गांधीजी म्हणायचे ‘जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून अधिकाधिक उत्पादन हवे’. या दोन्ही दृष्टिकोनांचा संगम म्हणजेच आजच्या काळात समावेशक आणि परिणामकारक विकास.’ असे गडकरी म्हणाले.
    Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर उडवून देण्याची धमकी, पोलिस लोकेशनला पोहोचताच…
    राजकीय चर्चांमध्ये नेहरूंवर काश्मीर, चीन आणि समाजवादी धोरणांबाबत टीका केली जाते, तर गांधीजींवर फाळणीवेळी पाकिस्तानला मदतीसाठी आग्रह धरल्याबद्दल प्रश्न उपस्थित होतो. मात्र गडकरींचे वक्तव्य हे नेहरू-गांधी धोरणांचा आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने सकारात्मक उपयोग करणारे असल्याने महत्त्वाचे ठरते.

    विदर्भाच्या संदर्भात बोलताना गडकरी म्हणाले की, “विदर्भात महाराष्ट्रातील ७५ टक्के खनिजसंपत्ती, ८० टक्के जंगल आणि कोळशाचे विपुल साठे आहेत. या निसर्गसंपत्तीचा योग्य वापर करून हरित उद्योग, स्टील, कृषी प्रक्रिया आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करता येऊ शकतो. नागपूर हे मॉडेल सिटी म्हणून पुढे यावे.’ ते पुढे म्हणाले, ‘रोजगारनिर्मिती ही आमची प्राथमिकता आहे. योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून आणि विदर्भातून निर्यात वाढवून संपूर्ण क्षेत्र समृद्ध करता येईल. विदर्भ समृद्ध झाला, तर महाराष्ट्र समृद्ध होईल आणि त्यातून भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा आत्मनिर्भर भारताचा स्वप्न साकार होईल.’ गडकरी यांनी विदर्भाला ‘हरित उद्योग आणि एकात्मिक लॉजिस्टिक्सचे केंद्र” बनवण्याची गरज व्यक्त केली. ‘नागपूर हे एक मॉडेल शहर बनू शकते, जिथे पायाभूत सुविधा उद्योगांना आधार देतात आणि लघुउद्योगांना उभारी मिळते,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा