• Sun. Mar 8th, 2026
    Raj Thackeray: महाराष्ट्राला नख लावणाऱ्यांना अंगावर घेऊ; राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा

    Shekap 78th Anniversary MNS Raj Thackeray: तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागणार असेल, तर तुम्हाला अंगावरही घेऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला.

    raj thackeray (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, पनवेल: महाराष्ट्रातील मुलांना हिंदी कशी येईल, याचा विचार आमचे मुख्यमंत्री करतात, परंतु बाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी यावी यासाठी मात्र ते प्रयत्न करीत नाहीत’, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी लगावला.

    पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शेकापने पनवेलमधील कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात ठाकरे यांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शेकापचे कौतुक केले. शिवसेनेच्या पहिल्या अधिवेशनाची त्यांनी आठवण करून दिली. ‘भगव्या व्यासपीठावर प्रथमच कॉम्रेड श्रीपाद डांगे यांच्या रूपाने लाल ध्वज फडकत होता. आज लाल ध्वजासह दोन भगवे ध्वज उपस्थित आहेत. त्यावेळचे राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते. आता तसे राहिले नाही’, अशी टिप्पणी राज यांनी केली.
    Mumbai Crime: तीन लग्नं मोडली, प्रेग्नंट होताच चौथा तरुणही पळाला, दुर्धर आजारी महिलेचं भयंकर कृत्य, 6 महिन्याच्या लेकराला…
    ‘देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री गुजराती आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. गृहमंत्री एका मुलाखतीत सांगतात, मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे. मात्र, आम्ही भाषेविषयी, राज्याविषयी बोललो तर संकुचित ठरतो. गुजरातमध्ये हिंदी भाषेची सक्ती नाही. मग महाराष्ट्रातच हिंदी कशासाठी’, असा सवाल त्यांनी केला. ‘महाराष्ट्रात गुजराती साहित्य संमेलन भरविले जाणार आहे. खुशाल भरवा. यावर शिवसेना व मनसे काहीतरी बोलतील, असे त्यांना वाटत होते. परंतु लक्षात ठेवा, तुम्हाला जे वाटते ते आम्ही मुळीच बोलणार नाही. पण आम्हाला जे वाटते तेच आम्ही बोलू. गुजरातचे नागरिक नसलेल्या नागरिकांना शेतजमीन घेता येत नाही. रिझर्व्ह बँकेची विशेष परवानगी घ्यावी लागते’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
    वसई-विरार महापालिकेत मोठा बांधकाम घोटाळा; प्रतिचौरस फूट १० ते २५ रुपये कमिशन, ईडीचा धक्कादायक खुलासा
    ‘नव्या कायद्याप्रमाणे एखाद्या प्रकल्पाविरोधात बोलल्यास शहरी नक्षली ठरवणार असाल, तर अटक करूनच दाखवा’, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले. ‘मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत. मराठी माणसाचा मानसन्मान राखून उद्योग आणावे लागतील. छत्रपतींच्या राजधानीत डान्सबार सुरू आहेत, यापेक्षा शरमेची गोष्ट काय? बंद झालेले डान्सबार सुरू कसे’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘गुजरातमध्ये २० हजार बिहारींना हाकलून देणारे अल्पेश ठाकूर भाजपात प्रवेश करतात व त्यांचा सत्कार केला जातो आणि राज ठाकरेला देशद्रोही म्हटले जाते. स्वत:च्या राज्याची काळजी घेणारे हे लोक दुसऱ्या राज्यात मात्र गोंधळ घालायला येत आहेत’, अशी मल्लिनाथीही राज यांनी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा