Vidarbha Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे नागरिाकांना मोठ्या उकाडा सहन करावा लागत आहे. पुढील सात दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे, हवामान खात्याने वर्तवली आहे.
पावसाच्या अनुपस्थितीमुळे विदर्भात उष्णतेचा जोर वाढत चालला आहे. दिवसाढवळ्या उकाडा आणि रात्रीही दमटपणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार ढगाळ वातावरण निर्माण होत असलं, तरी पाऊस काही कोसोंवर थांबतो आहे. यामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचं वातावरण आहे, कारण खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला नियमित पाऊस सध्या नाहीसा झालेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात सध्या कोणतेही प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाच्या हालचाली थांबल्या आहेत. त्याशिवाय, मान्सूनी वारे उत्तर भारताच्या दिशेने, हिमालयाच्या दिशेने सरकले आहेत. त्यामुळे मध्य भारत आणि विदर्भातील पावसाची शक्यता अधिकच कमी झाली आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
या दरम्यान, काही भागांमध्ये स्थानिक ढगांच्या कारणाने हलक्याशा सरी पडू शकतात. मात्र, जोरदार किंवा व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमीच असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. विशेषतः दैनंदिन गरजा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.
पुढील सात दिवस पावसाविना
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात पुढील सात दिवस पावसाची शक्यता कमी असून, ढगाळ वातावरण आणि वाढलेलं तापमान कायम राहणार आहे. उकाड्यामुळे शारीरिक त्रास जाणवण्याची शक्यता वाढल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, काही भागांत विजांसह, हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

