Shivsena Bhaskar Jadhav: आमदार भास्कर जाधव यांनी मतदारसंघातील सहकाऱ्यांनी साथ सोडल्याने खंत व्यक्त करत लवकरच जाहीर मेळावा घेऊन आपली भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.
निकटवर्तींयांनी साध सोडल्यानंतर मनातील खंत व्यक्त करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलंय की, “मित्रांनो, मी पण माणूस आहे, मला पण मन आहे. वेदना होतात मनाला… राजकारण करायला मला कोणी शिकवण्याची गरज नाही. ४० वर्ष मी याच क्षेत्रात आहे. एक गेला तर चार निर्माण करेन. परंतु मी आक्रमक असलो तरी अत्यंत संवेदनशील आहे, एवढी वर्ष जीवाभावाप्रमाणे जपलेली माणसं घर सोडून जातात तेव्हा दुःख तर होणारच ना? जे गेलेत ते आता बाकी सर्वांना फोन करून आम्ही विकासाकरता गेलो आहोत, तुम्हीही आमच्यासोबत या, असं सांगत आहेत. परंतु थांबा, घाई करू नका. यापूर्वी जे गेले त्यांनी विकासाकरता किती पैसे आणले? आणि कोणता विकास केला? हे जरा तपासून बघा. आता जे गेले आहेत ते विकासाकरता किती पैसे आणणार आहेत? नक्की कोणता व कोणाचा विकास करणार आहेत? हेही जरा अनुभवा आणि पाहा. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कसल्याही भूलथापांना बळी पडू नका, यांच्या खोटेपणाच्या नादी लागू नका,” असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलं आहे.
Ratnagiri News : अजितदादांच्या राष्ट्रवादीचा खंदा समर्थक कबड्डीपटू हरपला, प्रभाकर दादा नाही राहिला
“ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा डौलाने फडकवत ठेवणार”
भास्कर जाधव यांच्याही पक्षांतराच्या चर्चा अधूनमधून रंगत असतात. या चर्चा खोडून काढत जाधव यांनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे. “अजून माझी आमदारकीची चार वर्ष बाकी आहेत याची जाणीव स्वकीयांना नसली तरी विरोधकांना नक्की आहे. लाथ मारेन तिथे पाणी काढायची माझ्यात धमक आहे आणि हो त्याउपर याबाबतीत तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर थेट माझ्याशी बोला. अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपले सर्वांचे प्रेम तर माझ्यावर आहेच, त्यात अधिकची वाढ व्हावी ही अपेक्षा करतो आणि तुम्हाला सोबत घेऊन आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवत ठेवेन याची खात्री देतो,” असं जाधव म्हणाले.
दरम्यान, “मी 2007 पासून मी गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे काम करायला सुरुवात केली त्यावेळेला कोणत्याही गावामध्ये एखादा सरपंच देखील आपल्या विचाराचा नव्हता. तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन, सर्वांशी आपुलकीने वागून, विरोधकांच्या धाकदपटशाही, लेखणीचा दहशतवाद याविरोधात लढून खऱ्या अर्थाने विकासाचे खरे रूप गुहागरला दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला… खाजगी मालकीच्या असलेल्या अनेक पायवाटा, विहिरी, रस्ते, सभागृह, पाणीयोजना मी जनतेसाठी मोकळ्या करून दिल्याच. त्याचबरोबर वाड्या–वस्त्यांवर रस्ता, पाणी, वीज, पूल, सामाजिक सभागृह अशी कितीतरी विकासाची कामं करण्याचं भाग्य मला लाभलं. दोन वेळा आलेल्या निसर्गाच्या संकटावेळी तुमच्या सर्वांच्या पाठी मी ठाम उभा राहून नुकसान भरपाई मिळवून देण्यासोबतच सर्वांचे जीवन पूर्ववत होण्यासाठी महाराष्ट्रातील सगळी यंत्रणा माझ्या गुहागरमध्ये आणली. लोकप्रतिनिधी म्हणून माझे हे कर्तव्य बजावण्यात मी कधी कसूर केलेलीच नाही, परंतु त्याही पलीकडे आपल्यापैकी अनेकांच्या वैयक्तिक अडचणीत मग पंचायत समिती असो, तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन असो, कुठे अपघात झाला असो व दवाखाना असो प्रत्येक प्रसंगात तुमच्यासोबत खंबीरपणे उभा राहिलो आहे. वैद्यकीय मदत करताना पुणे –मुंबईसारख्या ठिकाणी आपणाला सर्वोत्तम उपचार देण्यासाठी कायम झगडलो आहे. कोरोनासारख्या संकटात माझ्या स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना घरात बसून न राहता आपणा सर्वांना योग्य उपचार मिळावेत, चाकरमानी सुखरूप आपल्या घरी यावेत म्हणून प्रसंगी अनेकांचा वाईटपणादेखील घेतला आहे,” असं म्हणत भास्कर जाधव यांनी मतदारसंघात केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला आहे.

