• Wed. Jun 10th, 2026
    Mumbai News: मुंबईसाठी नवा ‘गोडे पाणी’ प्रकल्प; वर्सोवात निःक्षारीकरण प्रकल्पाची होणार उभारणी

    Mumbai News: वर्सोवात नि: क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार असून हा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचा फायदा कोणत्या वॉर्डांना होणार? जाणून घ्या प्रकल्पाबद्दल…

    varsova water projectAI (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    सुशांत मोरे, मुंबई : मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मनोरी प्रकल्पापाठोपाठ आता वर्सोवा येथेही नि:क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव (एलओआय) मागविले आहेत.

    या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज २०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना उपलब्ध केले जाणार आहे. मुंबई महापालिका प्रक्रिया केलेले हे पाणी संबंधित कंपनीकडून खरेदी करणार आहे. अभिव्यक्ती स्वारस्य काढल्यानंतर त्यात रुची दाखवणाऱ्या कंपनीकडून हरकती मागविल्या जातील आणि नंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. हा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
    शहापूर हादरलं! आईला लेकी झाल्या नकोश्या, जेवायला दिलं अन्…, तीन सख्ख्या बहिणींसोबत काय घडलं?
    वर्सोवा येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी महापालिकेने प्लँटचा आराखडा, निर्मिती, वित्त संचालन आणि हस्तांतरण मॉडेल अंतर्गत स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागविले. यामध्ये कंपनीलाच प्रकल्प आणि देखभाल खर्च करावा लागणार आहे. त्याबदल्यात मुंबई महापालिका एक हजार लिटरमागे पाण्याचे दर निश्चित करून ते कंपनीला अदा करणार आहे. यामध्ये पालिका त्या कंपनीकडून पाणी खरेदी करून त्याचा पुरवठा जलवाहिन्यांद्वारे करणार आहे.
    Ganeshotsav 2025: एका खड्ड्यामागे 15 हजार दंडाचा निर्णय जाचक, गणेशोत्सव मंडळांची सरकार दरबारी धाव
    ‘मनोरी’ प्रकल्पाला प्रतिसाद
    मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प निविदा प्रक्रियेतच अडकला. निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू करून महापालिकेने निविदा काढली असून त्याला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पातून समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ४०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. या प्रकल्पाचा फायदा पी उत्तर मालाड, पी दक्षिण गोरेगाव, आर मध्य बोरिवली पश्चिम, आर उत्तर दहिसर पश्चिम आणि आर दक्षिण कांदिवली पश्चिम या वॉडांना होईल. या प्रकल्प निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

    गरजेनुसार अन्य भागांत पाणीपुरवठा
    भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात २८५० दशलक्ष लिटर पाणी येते आणि येथून मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत पाणीपुरवठा केला जातो. वर्सोवा निःक्षारीकरण प्रकल्प झाल्यावर भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातून अंधेरी ते मालाड भागात होणारा पाणीपुरवठा गरजेनुसार अन्य भागात वळवला जाईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

    अंधेरी ते मालाड परिसराला फायदा
    वर्सोवा येथील निःक्षारीकरण प्रकल्पाचा फायदा अंधेरी वर्सोवा ते मालाड भागात राहणाऱ्यांना होईल, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. हे पाणी या पट्ट्यात वळते केले जाणार आहे. हा प्रकल्प वर्सोव्यातील विद्यमान सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या महापालिका जागेत उभारला जाणार आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा