मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. तेथे पोलिस आणि आपात्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत.
नेमकी घटना काय घडली?
मुंबई गोवा महामार्गावरून जाणार गॅस टँकर रत्नागिरीतील हातखांब येथील शाळेजवळ पुलावरून खाली कोसळला. ही घटना सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. गॅस लिकेज झाल्याची प्राथमिक माहिती असून स्फोटाचा धोका असल्याने त्याठिकाणी सतर्कता बाळगली जात आहे. यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली गेली आहे. नागरिकांनी या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही केले गेले आहे.
दरम्यान या सगळ्या घटनेचे तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे पोलिस यंत्रणा व सुरक्षा यंत्रणेचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. टँकर मधील लिकेज होत असलेला गॅसच्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यासाठी तीन ते चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. यामध्ये नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या समवेत अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे नितीन ढेरे, रत्नागिरी शहर व रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तैनात आहेत.
दरम्यान महामार्गावरती अशा स्वरूपाचे अपघात अलीकडे सातत्याने घडू लागले आहेत. हातखंब्याजवळच निवळी येथेही दोन महिन्यापूर्वी भीषण अपघात झाला होता या अपघातात गॅस टँकर व ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या अपघातात चिपळूण परिसरातील जवळपास 25 ते 30 शिक्षक जखमी झाले होते त्यावेळी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक जवळपास 14 ते 15 तास तास बंद ठेवावी लागली होती.

