• Mon. Mar 9th, 2026
    Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, हातखांब येथे गॅस टँकर पुलावरून खाली कोसळला

    मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. तेथे पोलिस आणि आपात्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर सातत्याने गॅस टँकर अपघात घडत आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यात असे अपघात घडले आहेत.आज पुन्हा काही वेळापूर्वी रात्रीच्या सुमारास हा मोठा अपघात घडला आहे. या घटनेत गॅसचा टँकर थेट पुलावरून कोसळल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे या अपघाताचे वृत्त कळताच पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ सुरू केल्या आहेत. याचाच भाग म्हणून काही नागरिकांनाही सुरक्षिततेसाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.

    नेमकी घटना काय घडली?
    मुंबई गोवा महामार्गावरून जाणार गॅस टँकर रत्नागिरीतील हातखांब येथील शाळेजवळ पुलावरून खाली कोसळला. ही घटना सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. गॅस लिकेज झाल्याची प्राथमिक माहिती असून स्फोटाचा धोका असल्याने त्याठिकाणी सतर्कता बाळगली जात आहे. यंत्रणा कार्यान्वित झाल्या आहेत. खबरदारी म्हणून मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली गेली आहे. नागरिकांनी या परिसरात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतूकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही केले गेले आहे.

    दरम्यान या सगळ्या घटनेचे तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे पोलिस यंत्रणा व सुरक्षा यंत्रणेचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली असून ती पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. टँकर मधील लिकेज होत असलेला गॅसच्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यासाठी तीन ते चार बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. यामध्ये नगरपरिषद व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या समवेत अपर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे नितीन ढेरे, रत्नागिरी शहर व रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तैनात आहेत.

    दरम्यान महामार्गावरती अशा स्वरूपाचे अपघात अलीकडे सातत्याने घडू लागले आहेत. हातखंब्याजवळच निवळी येथेही दोन महिन्यापूर्वी भीषण अपघात झाला होता या अपघातात गॅस टँकर व ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या अपघातात चिपळूण परिसरातील जवळपास 25 ते 30 शिक्षक जखमी झाले होते त्यावेळी मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक जवळपास 14 ते 15 तास तास बंद ठेवावी लागली होती.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा