• Mon. Mar 16th, 2026

    कुटुंबाचा घात करण्यासाठी घराभोवती विजेच्या प्रवाहित तारा सोडल्या, अन् रात्रीच्या अंधारात अनर्थ घडला

    कुटुंबाचा घात करण्यासाठी घराभोवती विजेच्या प्रवाहित तारा सोडल्या, अन् रात्रीच्या अंधारात अनर्थ घडला

    Crime News : राजकीय वैमनस्यातून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजीनाईक येथे एका कुटुंबाच्या घराला विजेच्या प्रवाहित तारा गुंडाळण्यात आल्या. यात त्या घरातील महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या पतीने गावातील सहा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या सहाही जणांना अटक केली आहे.

    हायलाइट्स:

    • घराला विजेच्या प्रवाहित तारा गुंडाळल्या
    • महिलेचा तारांना स्पर्श झाल्याने मृत्यू
    • राजकिय वैमनस्यातून सूड उगवला
    • सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
    (फोटो– Lipi)

    रवी राऊत, यवतमाळ : घराला करंट लावल्याने एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आर्णी तालुक्यातील अंजीनाईक येथे शनिवारी (२६ जुलै) पहाटेच्या सुमारास घडली असून राजकीय द्वेषातून हा घातपात घडवून आणल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घाटंजी पोलिस ठाण्यात सहा जणांवर खूनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पिंटी उर्फ सविता मनीष पवार (३७) रा.अंजी नाईक ता.आर्णी असे मृत महिलेचे नाव आहे. तर इंदल मोतीराम राठोड (४७ , सुदाम जयराम चव्हाण (६५), गणेश केशव राठोड (५९), विनोद रामकृष्ण चव्हाण (४८), राजु कवडु जाधव (३५), चेतन निवृत्ती चव्हाण (२८) सर्व रा. अंजी नाईक अशी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहे.याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथील मनीष पवार यांच्यासोबत गावातील इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजु जाधव, चेतन चव्हाण यांचा बऱ्याच वर्षापासून ग्राम पंचायत निवडणूक संबंधाने वाद सुरू होता. यापूर्वी देखील त्यांचे राजकीय वैमनस्यातून वाद झाले होते. त्या संदर्भात घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हेही नोंद आहेत. याच कारणावरून ते नेहमीच पवार कुटूंबीयांसोबत वाद करीत असत. एवढेच नव्हे तर खोट्या गुन्ह्यात फसवणार असल्याची चर्चा देखील गावात करत होते.
    Latur News : HIV बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं, संस्थाचालक म्हणतात, तो कर्मचारी…
    अश्यातच शुक्रवारी रात्री जेवणानंतर पवार कुटूंबीय घरात झोपले होते. दरम्यान शनिवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास मनीष पवार यांची पत्नी सविता हीला नैसर्गिकविधीकरीता जायचे असल्याने तिने पती मनीष यांना उठविले. त्यानंतर सविता हीने दरवाजा उघडला असता, ती अचानक घरात पडली. तर मनीष पवार यांच्या हाताला व पायाला करंट असलेल्या तारांचा झटका लागल्याने ते घराबाहेर पडले. दरम्यान त्यांनी आरडओरडा करीत परिसरातील नागरिकांना बोलावले. त्यानंतर घरात बेशुध्द असलेल्या सविताला परिसरातील नागरिकांच्या मदतीने आर्णीतील शासकीय रूग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासणीनंतर सविता हीचा करंट लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.
    Ratnagiri Crime: सासरा सतत काम सांगतो, नव्या सुनबाईंना आवडेना, रागाच्या भरात जेवणात विष टाकलं अन् दोघे… रत्नागिरी हादरलं
    या प्रकरणी मनीष पवार यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, माझ्या घराच्या बाहेरून तार बांधून त्याला आमच्या घरातील कोणाचा जीव जाईल, या उद्देशाने इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजु जाधव, चेतन चव्हाण कट रचून घराला करंट लावल्याने पत्नी सविता हीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी सहाही जणांवर खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास घाटंजी पोलिस करीत आहेत.
    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा