• Thu. Mar 12th, 2026
    फडणवीस-शहांची 20 मिनिटं बैठक, कोणाकोणाचे पत्ते कट? भाजपमधील 3 नावं विशेष चर्चेत

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे महायुतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. शिवसेनेच्या काही मंत्र्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची नवी दिल्लीत भेट घेतली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुती सरकारमध्ये महत्त्वाचे बदल होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार स्थापन होऊन ६ महिने उलटले आहेत. या कालावधीत वादग्रस्त ठरलेल्या, आरोप झालेल्या मंत्री आणि आमदारांची संख्या मोठी आहे. यातील सर्वाधिक मंत्री शिवसेनेचे आहेत.

    मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यात २० मिनिटं चर्चा झाली. फडणवीस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऊर्जा मंत्री मनोहर खट्टर यांनादेखील भेटले. शहा आणि फडणवीस यांच्या भेटीत महायुती सरकारमधील मंत्र्‍यांच्या गेल्या ६ महिन्यांमधील कामगिरीवर चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्‍यांना नारळ दिला जाण्याची दाट शक्यता आहे. काही मंत्र्‍यांचे विभाग भ्रष्टाचारांमुळे चर्चेत आहेत. त्या मंत्र्‍यांनादेखील बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली.

    hm amit shah

    महायुती सरकारमधील अनेक मंत्र्‍यांची गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी निश्चित मानली जात आहे. शिरसाट यांचा बेडरुममधील व्हिडीओ समोर आला. त्यात त्यांच्याजवळ पैशांनी भरलेली बॅग दिसत होती. त्यांच्या मुलाला हॉटेल खरेदी करता यावं यासाठी पात्रतेच्या अटी बदलण्यात आल्याचे आरोप झाले. शिरसाट यांना प्राप्तिककर विभागाची नोटिसही आलेली नाही. तर दुसरीकडे मंत्री कोकाटे विधान परिषदेत मोबाईलवर रम्मी खेळत असल्यानं अडचणीत आले. त्यांची अनेक विधानं वादग्रस्त ठरलेली आहेत.

    fadnavis and amit shah

    संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री संजय राठोड, भरत गोगावले, योगेश कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही मंत्रिपदावरुन दूर केलं जाऊ शकतं. महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात. ते उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आहेत.
    राहुल नार्वेकर यांना मंत्री होण्याची इच्छा आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. त्यांच्या जागी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. याबद्दल नार्वेकर यांना विचारलं असता, विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मी समाधानकारक काम केलेलं आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास मी तयार आहे, असं उत्तर त्यांनी दिलं.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा