• Sat. Mar 7th, 2026

    पुरंदर विमानतळासाठी काही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास नकार, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, आता…

    पुरंदर विमानतळासाठी काही शेतकऱ्यांचा जमिनी देण्यास नकार, अजितदादांनी स्पष्टच सांगितलं, आता…

    DCM AJit Pawar on Pune Purandar Airport : पुण्यातील पुरंदर विमानतळासाठी सासवड येथील जागा निश्चित झाली. काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. पण काहींनी अद्याप जमिनी देण्यास विरोधा केला आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल असे आश्वासन दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा. प्रतिनिधी, पुणे : ‘विमानतळ करण्यासाठी अनेक जागा पाहिल्या. मात्र, विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील सासवडजवळील जागा त्या दृष्टीने योग्य ठरली. पुण्याजवळ दुसरी जागा सध्या दिसत नाही. तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, त्यांना नाराज न करता विश्वासात घेऊन हा विमानतळ करण्याची सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना इतर ठिकाणी शेतीवाडी करता येईल. त्यासाठी त्यांचे त्याच भागात पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

    पुण्यात सर्किट हाउस येथे विविध विभागांच्या बैठका शुक्रवारी घेतल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी पुरंदर विमानतळाच्या पॅकेजबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी या वेळी उपस्थित होते. ‘पुरंदर विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांना विश्वासात घेऊन तेथे विमानतळ करायचा, असे मंत्रिमंडळाने ठरविले आहे. सध्याचे पुण्याचा विमानतळ संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे पुण्याला दोन धावपट्ट्या असणारे, कॉर्गो, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर या पाच-सहा जिल्ह्यांचा विचार करता विमानतळाची गरज आहे. अनेक ठिकाणच्या जागा पाहिल्या. सध्या तरी सासवडखेरीज पुण्याजवळ दुसरी जागा दिसत नाही. तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यांना नाराज करायचे नाही. त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांना इतर ठिकाणी शेतीवाडी करता आली पाहिजे. त्यांची घरे पुन्हा उभी राहिली पाहिजे,’ अशी भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली.
    Purandar Airport: विमानतळ भूसंपादनाचा तिढा सुटला; जमिनीसाठी शेतकऱ्यांना मिळणार चौपट मोबदला, बाधितांना रोजगार
    ‘सध्या जेवढे क्षेत्र घेत आहोत, त्यात एकही गाव जात नाही. पूर्वी संपादित करण्यात येणाऱ्या गावांपैकी काही क्षेत्र कमी केले आहे.
    पुरंदरमधील शेतकऱ्यांचे पुनर्वसन त्याच भागात केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) धोरणानुसार, जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. पुरंदरमधील शेतकरी हे आमचेच लोक आहेत. कृपा करून गैरसमज करून घेऊ नका, गैर अर्थ काढू नका, असे आवाहन पवार यांनी केले. ‘शहराच्या आणि परिसराच्या दृष्टिकोनातून तो जागा विमानतळाच्या योग्यतेची निघाल्याने तेथे विमानतळ करावा लागेल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा