• Tue. Jun 9th, 2026

    Mumbai Weather: मुंबईकरांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा! जोरदार पाऊस बरसणार, असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज

    Mumbai Weather: मुंबईकरांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा! जोरदार पाऊस बरसणार, असा आहे हवामान खात्याचा ताजा अंदाज

    Mumbai Rain News: मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना किनारपट्टी भागात न जाण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    मुंबईकरांनो, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा! जोरदार पाऊस बरसणार (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: मागील काही आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला असून मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी जोरदार सरी बरसत आहेत. पावसाची ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असून हवामान खात्याने महाराष्ट्र राज्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. मुंबई शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

    “सध्या मुंबई शहरात व लगतच्या जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे, वाहने सावकाश चालवा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये,” असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मदतीसाठी दोन नंबरही जारी केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत #१०० / #११२ डायल करा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

    कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?

    हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    “ट्रॅफिक अपडेट तपासा, असुरक्षित ठिकाणी थांबू नका आणि वादळात इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवा,” असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी देखील IMD ने सल्ला दिला आहे. वादळात वीज पडण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी उघड्या जागेत आणि उंच झाडाजवळ थांबू नये, पिके आणि जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा