Mumbai Rain News: मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जोरदार पावसाची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना किनारपट्टी भागात न जाण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
“सध्या मुंबई शहरात व लगतच्या जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे, वाहने सावकाश चालवा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये,” असं आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तसंच पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मदतीसाठी दोन नंबरही जारी केले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत #१०० / #११२ डायल करा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
सध्या मुंबई शहरात व लागतच्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून नागरिकांना विनंती आहे की त्यांनी किनारपट्टी भागात जाणे टाळावे, वाहने सावकाश चालवा आणि विनाकारण घराबाहेर पडू नये,पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कृपया आपत्कालीन परिस्थितीत #१०० / #११२ डायल करा.…
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) July 25, 2025
कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा?
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
“ट्रॅफिक अपडेट तपासा, असुरक्षित ठिकाणी थांबू नका आणि वादळात इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद ठेवा,” असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी देखील IMD ने सल्ला दिला आहे. वादळात वीज पडण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी उघड्या जागेत आणि उंच झाडाजवळ थांबू नये, पिके आणि जनावरांची योग्य काळजी घ्यावी, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

