• Thu. Mar 12th, 2026
    पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला अन् अडीच वर्षांचा रिदम कायमचा निघून गेला, कोल्हापूर हळहळलं

    Kolhapur Toddler Drown: खेळता खेळता पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला आणि अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात खेळता खेळता पाणी भरलेल्या खोल खड्ड्यात पडून अडीच वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही बातमी बघता बघता वाऱ्यासारखी शहरात पसरल्यामुळे संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

    जयसिंगपूरच्या वरेकर कॉलनी परिसरात मनाला चटका लावणारी ही घटना घडली आहे. येथे अडीच वर्षांचा रिदम राय या चिमुकल्याचा नकळतपणे पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. मोबाईल टॉवरसाठी खोदण्यात आलेला हा खड्डा उघडा ठेवण्यात आला होता. याच खड्ड्यात पडून त्याचा मृत्यू झाला आहे.
    Pune Accident: टँकरची दुचाकीला जोरदार धडक, तरुण-तरुणीचा तडफडून अंत, पुण्यातील हृदयद्रावक घटना, पाहणारे सुन्न

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरेकर कॉलनीतील चांदणे कुटुंबीयांच्या जागेवर इंडस कंपनीकडून मोबाईल टॉवर उभारणीचं काम सुरू आहे. यासाठी अंदाजे 10 फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तो खड्डा अनेक दिवसांपासून उघडाच ठेवण्यात आला होता. पावसामुळे त्या खड्ड्यात पाणी साचलेले आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास चिमुकला घराजवळ खेळत असताना अचानक त्या खड्ड्यात पडला. पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, चिमुकल्याच्या आईवर शनिवारी शस्त्रक्रिया उपचार होणार आहेत. त्यामुळे घटना घडली त्यावेळी आई सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही रिपोर्ट्स आणण्यासाठी गेली होती. ती परत आल्यावर या घटनेची माहिती तिला देण्यात आली. त्यामुळे आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता.

    दुर्घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडीच वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह खड्ड्यातील पाण्यातून बाहेर काढत जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

    दरम्यान, इंडस कंपनी आणि संबंधित कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जबाबदारांवर कारवाई होणार का? आणि अशा घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन कोणती ठोस पावलं उचलणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा