• Sat. Mar 7th, 2026

    ‘ही घुसमट आहे; मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार’; जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी नेमकं काय म्हणाल्या?

    ‘ही घुसमट आहे; मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार’; जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी नेमकं काय म्हणाल्या?

    Ruta Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे. राजकारण म्हणजे सभागृहात फक्त गोंधळ असून त्यात सामान्य नागरिकांच्या हिताचं काहीच बोललं जात नाही, असा दावा ऋता आव्हाड यांनी केला. तसेच जितेंद्र आव्हाडांनी राजकारणातून बाहेर पडावं, अशी त्यांची इच्छा आहे. पण राजकारण हेच आव्हाडांचं जीवन असल्याने ते शक्य नसल्याचं देखील ऋता आव्हाड म्हणाल्या आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीतलं मोठं नाव आहे. जितेंद्र आव्हाड अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. जितेंद्र आव्हाड त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जातात. ते पक्षाची बाजू नेहमी ठासून मांडतात. तसेच त्यांचं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही निस्सीम प्रेम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरही जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. याउलट ते शरद पवार यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. आव्हाड अनेकदा विरोधकांचा वैचारिक पद्धतीने प्रतिकार करताना दिसतात. पण विधान भवन परिसरात त्यांचे समर्थक आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये नुकताच राडा झाला. सध्याच्या या राजकारणावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी खूप बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

    नेतेमंडळी समाजासाठी स्वत:ला वाहून घेतात. पण समाजकारण आणि राजकारण करत असताना या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्या कुटुंबाला देखील अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. जितेंद्र आव्हाड यांना अनेकदा धमक्या देखील आल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. त्यामुळे या एकंदरीत परिस्थितीवर ऋता आव्हाड यांनी ‘लगाव बत्ती’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

    आव्हाडांनी राजकारणातून बाहेर पडावं, अशी पत्नीची इच्छा

    “राजकारण हे फत्त गोंधळापुरतं मर्यादीत राहिलं आहे. मला हेच सांगायचं आहे. राजकारण याचा अर्थ काय? आता तुम्ही आपल्या सगळ्या सभागृहांमध्ये जे बघितलंत काय होतं? गोंधळ होतो. असं काही होतं का एक नागरीक म्हणून माझ्या हिताचं तिकडे काही बोललं जातं का? नाही. मग आता आव्हाड खूप पुढे गेले आहेत. आता ते त्या चक्रव्यूहात अडकले आहेत. पण तेही त्यातून बाहेर पडले तर मला खूप आवडेल”, असं ऋता आव्हाड म्हणाल्या आहेत.

    “मला स्वत:ला हा खूप तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. अशा बऱ्याच घटना घडतात, अशी बरेचशी लोकं समोर असतात, ज्यांच्याबरोबर समोर बसणंच नाही तर त्यांच्यासोबत असोसिएट होणं देखील मला आवडलं नसतं. पण माझ्यावर हे कम्पलशन आहे की, मी त्यांना काही बोलू शकत नाही. ही घुसमट आहे ती फक्त जो त्यातून जात असतो त्यालाच कळते”, असं ऋता आव्हाड म्हणाल्या.

    ‘तुम्हाला कुठे शू बाईट्स होत आहेत हे फक्त तुम्हालाच कळतं’

    “मी नेहमी सांगते की, तुम्ही एक खूप सुंदर छान बूट घातला आहे. तो मला समोरुन खूप छान वाटतोय. पण आतमध्ये ते घालून तुम्हाला कुठे कुठे शू बाईट्स होत आहेत हे फक्त तुम्हालाच कळतं. जसं म्हणतात की, मुकुट काटेरी असतात हे अगदी खरं आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सगळंच सकारात्मक मिळणार नाही. तुम्हाला पुष्पगुच्छ देखील मिळणार आणि इतर गोष्टी देखील मिळणार आहेत. ऑफिसमध्ये सुद्धा पॉलिटिक्स असतं. सगळीकडे पॉलिटिक्स असतं. पण जेव्हा तुमच्याकडे चॉईस असतो की तुम्ही तिथून निघून जाऊ शकतात. मला नाही आवडलं तर मी दुसरी नोकरी किंवा क्षेत्र बघते असं सांगू शकते. पण इथे माघार घेता येणार नाही, असं त्यांना वाटत नाही. आता ते दुसरं काही करुच शक्त नाहीत. ते गेले कित्येक वर्ष राजकारणातच आहेत. ते त्यांचं आता आयुष्य आहे. त्यामुळे ते सोडणार नाही”, असं ऋता आव्हाड म्हणाल्या.

    “तुम्ही विचारलं की, तुमचे पती राजकारणात आहेत तर तुम्हाला काय वाटतं? तर मी ज्या बँकग्राउंडमधून आम्ही मोठे झालो, ज्या बँकग्राउंडमधून मी बाहेर देशांमध्ये फिरुन बघितलं आहे, ते सगळं पाहिल्यानंतर आपल्याकडून जे बदल घडत आहेत, आपल्याकडे हळहळू पिछेहाट होत आहे. विचारांपासून सगळ्याच बाबतीत आपली पिछेहाट होत आहे. जेव्हा जग पुढे जात आहे तेव्हा आपण खूप वेगवेगळ्या गर्तेत गुरफटून जात आहोत. पण मला त्याचा भाग व्हायचं नाही. मग मी का होऊ? लोकांचं भलं खूप वेगळ्या प्रकारे देखील करता येऊ शकतो. आज उद्योगपतींकडे जेवढे अधिकार आहेत तेवढे राजकारण्यांकडे देखील नाहीत जे आरडी टाटा, गोदरेज सारख्या उद्योगपतींनी लाखो लोकांना रोजगार दिले. तुम्ही ती अथोरिटी घ्या ज्याने तुम्ही लोकांचे जीवनमान उंचावाल. ती अथोरिटी घ्या. केवळ राजकारणीच होऊन लोकांचं भलं करता येत नाही”, असं परखड मत ऋता आव्हाड यांनी मांडलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा