Sudhir Mungantiwar on Raj-Uddhav Thackeray : हाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, मराठी भाषा आणि जादूटोण्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरु झाली आहे. यावर भाजपा नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून प्रतिक्रिया दिली.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याची गरजच नाही. हेच सरकार आहे ज्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, जो काँग्रेस सरकार कधीच देऊ शकले नव्हते.’ १९५६ मध्ये सीमावर्ती भागातील मराठी भाषिक नागरिकांची झालेली हेळसांड सांगताना मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. ‘कारवार, निपाणी, बेळगाव, रायचूर हे मराठी भाषिक भाग जबरदस्तीने कर्नाटकात विलीन करण्यात आले, त्याला पंडित नेहरू जबाबदार होते,’ असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
Raj Thackeray : ‘समुद्रात डुबवून मारू’; राज ठाकरेंच्या टीकेनंतर निशिकांत दुबेंचं प्रत्युत्तर, सहा शब्दात डिवचलं, काय म्हणाले…
ते पुढे म्हणाले की, ‘आज कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर भाषिक अन्याय केला जातो. मात्र महाराष्ट्र सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहे. मंत्री उदय सामंत यांनी त्या भागातील मराठीच्या संरक्षणासाठी निधी देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हे सरकार मराठीच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनशील आणि वचनबद्ध आहे.’ राज ठाकरे यांनी केलेल्या धमकीच्या विधानावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘जर राज ठाकरे यांच्याकडे काही ठोस सूचना असतील, तर त्यांचे स्वागत आहे. पण मराठीवर केवळ राजकीय स्वार्थासाठी राजकारण नको,’ असे मुनगंटीवार म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्यावरही मुनगंटीवारांनी जोरदार टीका केली. ‘जेव्हा सतत पराभवाचे चटके बसतात, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला ‘सिंदूर लावलेली’ वाटते. ही मानसिकता पराभवाने निर्माण होते,’ असा टोला मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ असे नाव देण्यात आल्यावर मुनगंटीवार म्हणाले, “हो, ते ब्रँड नक्कीच आहेत, पण तो ब्रँड आता बाजारात चालत नाहीये. अनेक ब्रँड बाजारात येतात पण सगळ्यांना ग्राहकांची पसंती मिळतेच असे नाही.’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डायनासोर कापला का?’ आणि ‘जादूटोण्यामुळे सत्ता मिळाली’ अशा विधानावर मुनगंटीवारांनी गंभीर प्रतिक्रिया दिली. ‘राजकारणाचा स्तर डायनासोर आणि जादूटोण्यापर्यंत गेला आहे. जादूटोण्याने जर सत्ता मिळाली असती, तर जादूटोणा करून आपला देशाची गरीबी हटवता आली असती आणि देशामधल्या जो काही जातिवाद आहे तो हटवता आला असता, जादूटोणा नावाची गोष्ट जगात नाही आहे. आणि जादूटोणा करता आला असता तर भारत हा जगात सर्वात जास्त श्रीमंत आणि पराक्रमी देश राहिला असता आणि साडेसातशे वर्ष आपल्याला गुलामगिरी भोगावे लागली नसती, असे म्हणत त्यांनी या प्रकारच्या विधानाची आक्षेप घेतला.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा
